स्वाक्षरी मोहिमेपेक्षा जनआंदोलन करा
By Admin | Updated: June 10, 2015 02:39 IST2015-06-10T02:39:14+5:302015-06-10T02:39:14+5:30
जिल्हा निर्मितीसाठी पुसद विकास मंचचे स्वाक्षरी मोहीम व ठिय्या आंदोलनापेक्षा जनआंदोलनावर भर द्यावा,

स्वाक्षरी मोहिमेपेक्षा जनआंदोलन करा
पुसद : जिल्हा निर्मितीसाठी पुसद विकास मंचचे स्वाक्षरी मोहीम व ठिय्या आंदोलनापेक्षा जनआंदोलनावर भर द्यावा, असा सल्ला माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांनी येथे मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. जिल्हा निर्मितीसाठी उमरखेड व महागाव तालुक्यात नव्या तालुक्यांची निर्मिती करून दिग्रसचा समावेश पुसद जिल्ह्यात करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांनी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार नाईक म्हणाले, सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना पुसद जिल्हा करण्यासाठी त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. यासाठी अनसिंग तालुका निर्मिती करून अनसिंग, मानोरा, दिग्रस, पुसद, उमरखेड व महागाव या सहा तालुक्यांचा समावेश करून पुसद जिल्हा होणार होता. परंतु दुर्दैवाने सुधाकरराव दीड वर्षात पायउतार झाले आणि प्रश्न मागे पडला. नंतरच्या काळात अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना पुसद जिल्हा निर्मितीसाठी आपण स्वत: त्यांची भेट घेतली. त्यांच्याकडे जिल्हा निर्मितीची मागणी केली. त्यावेळेस आमदार माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जिल्हा निर्मितीची मागणी केली. त्यावेळी आमदार माणिकराव ठाकरे यांनी दारव्हा व दिग्रस तालुक्यांचा समावेश करून नका अशी भूमिका घेतल्याने हा प्रश्न रेंगाळला होता. पुसद जिल्हा निर्मितीसाठी माझा कोणताही विरोध नाही. जिल्ह्यासाठी कोणीही नेतृत्व करा मी त्यांच्या सोबत आहे, असे त्यांनी सांगितले.
पुसद विकास मंचने जिल्हा निर्मितीचा मुद्दा ऐरवणीवर घेतला आहे. मात्र स्वाक्षरी अभियान व ठिय्या आंदोलन देऊन हा प्रश्न सुटणार नाही यासाठी जनआंदोलनाचा रेटा आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. उमरखेड तालुक्यात नव्याने दोन तालुक्यांची निर्मिती करून दिग्रसचा समावेश पुसद जिल्ह्यात करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. पुसद जिल्ह्यासाठी कोणीही नेतृत्व करो मी त्यांच्या सोबत आहे.
मी कोणत्याही प्रकारचे राजकारण करीत नाही व जिल्ह्याला विरोधसुद्धा नाही. विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहे, असे ना. नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक आसेगावकर, जिल्हा बँकेचे संचालक आर.डी. राठोड, विजय चव्हाण उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)