थंडीने भूईमुगाच्या पेरण्या लांबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST2020-02-10T05:00:00+5:302020-02-10T05:00:31+5:30
उन्हाळ्यात प्रामुख्याने भूईमुगाची पेरणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते. ओलिताची व्यवस्था असणारे शेतकरी आणि कॅनॉलच्या माध्यमातून ओलित करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. भूईमुगाच्या पेरणीसाठी उष्मांक अधिक असणे गरजेचे आहे. तरच पेरलेले बियाणे व्यवस्थित अंकुरते.

थंडीने भूईमुगाच्या पेरण्या लांबल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वातावरणात निर्माण झालेल्या गारठ्याने जिल्ह्यातील भूईमुगाच्या पेरण्या लांबल्या आहेत. यासोबतच जंगली जनावराच्या उद्रेकाने पेरा क्षेत्रात घट होण्याची दाट शक्यता आहे.
उन्हाळ्यात प्रामुख्याने भूईमुगाची पेरणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते. ओलिताची व्यवस्था असणारे शेतकरी आणि कॅनॉलच्या माध्यमातून ओलित करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. भूईमुगाच्या पेरणीसाठी उष्मांक अधिक असणे गरजेचे आहे. तरच पेरलेले बियाणे व्यवस्थित अंकुरते. यावर्षी वातावरणात अचानक बदल झाला. गारठा मोठ्या प्रमाणात वाढला. हे वातावरण पेरणीस योग्य नाही. यामुळे भूईमुगाची पेरणी पुढे सरकली आहे.
कृषीसेवा केंद्रामध्ये भूईमुगाचे बियाणे पोहोचले आहे. मात्र वातावरण ‘सुट’ न झाल्याने पेरण्या पूर्णत: थांबल्या आहेत. यातून विक्रेतेही बुचकळ्यात पडले आहेत. उन्हाचा पारा वाढल्यानंतर पेरणी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वातावरणातील बदलाने पेरण्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. यामुळे भूईमुगाचे उत्पादन प्रभावित होण्याची शक्यता असून शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत पडले आहे.
रानडुकरांचा मोठा धोका
शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस वाढला आहे. यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. त्याचे संरक्षण करायचे कसे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रानडुकराच्या वाढत्या त्रासाने उन्हाळी भूईमुगाचे लागवड क्षेत्र घटण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.