५०० रुपयांसाठी नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 05:00 AM2020-04-09T05:00:00+5:302020-04-09T05:00:15+5:30
केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या जनधन खात्यात पुढील तीन महिने प्रत्येकी ५०० रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एप्रिल महिन्याचे ५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले. याबाबत माहिती मिळताच महिलांनी येथील ग्राहक केंद्रासह विविध बँकांच्या शाखांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी केली. परिणामी शहरातील सर्वच बँकांच्या शाखांमध्ये महिलांची गर्दी दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : जनधन खात्यातून मिळणाऱ्या अवघ्या ५०० रुपयांसाठी नागरिक आपले लाखमोलाचे आरोग्य धोक्यात घालत आहे. या पैशासाठी ग्राहक सेवा केंद्रासमोर महिलांची गर्दी होत आहे. या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे.
केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या जनधन खात्यात पुढील तीन महिने प्रत्येकी ५०० रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एप्रिल महिन्याचे ५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले. याबाबत माहिती मिळताच महिलांनी येथील ग्राहक केंद्रासह विविध बँकांच्या शाखांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी केली. परिणामी शहरातील सर्वच बँकांच्या शाखांमध्ये महिलांची गर्दी दिसून येत आहे.
संबंधित बँकांच्या सेवा केंद्रांवर मोठी गर्दी झाली आहे. केवळ ५०० रुपये काढण्यासाठी महिला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवून गर्दी करत आहे. दोन महिलांमध्ये सुरक्षित अंतर नसल्याने कोरोनाचा संसर्ग बळावण्याचा धोका निर्माण झाला आहे. केवळ ५०० रुपयांसाठी अनेक महिला आपले आरोग्य धोक्यात घालत असल्याचे दिसत आहे.
संचारबंदीमुळे त्वरित पैसे खात्यातून काढण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाली आहे. शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी हेच चित्र दिसून येत आहे. यामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
संचारबंदीमुळे अडचण
लॉकडाऊनमुळे दुपारी ३ वाजतापर्यंतच अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याचे निर्देश आहे. आता जनधन खात्यात पैसे जमा झाल्याने सकाळी ११ वाजतापासूनच महिला घराबाहेर पडत आहे. संचारबंदीमुळे खात्यातून पैसे काढण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे.