भाजपसमोर अंतर्गत बंडाळीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 05:00 AM2022-07-16T05:00:00+5:302022-07-16T05:00:25+5:30

प्रशासनाची निवडणूक पूर्व तयारी झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्त्याच्या हालचालींना वेग आला आहे. मागील पंचवार्षिकमध्ये थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. नंतर भाजपने शिवसेनेला सोबत घेत उपाध्यक्ष  व एक सभापती पद देऊन सत्तेत सहभागी करून घेतले होते.  मात्र, २०१९ मध्ये राज्यात भाजप व शिवसेनेची युती फिस्कटली होती. तथापि, पालिकेत भाजप व शिवसेना युती कायम होती.

Challenge of internal rebellion before BJP | भाजपसमोर अंतर्गत बंडाळीचे आव्हान

भाजपसमोर अंतर्गत बंडाळीचे आव्हान

googlenewsNext

अविनाश खंदारे
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : पालिकेवरील वर्चस्वासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपकडून रणनीती आखली जात आहे. एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, प्रहार सुद्धा रिंगणात आहे. तिसरी आघाडी निर्माण होण्याचे संकेत असून भाजपला अंतर्गत बंडाळीला सामोरे जावे लागत आहे. 
प्रशासनाची निवडणूक पूर्व तयारी झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्त्याच्या हालचालींना वेग आला आहे. मागील पंचवार्षिकमध्ये थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली होती. नंतर भाजपने शिवसेनेला सोबत घेत उपाध्यक्ष  व एक सभापती पद देऊन सत्तेत सहभागी करून घेतले होते.  मात्र, २०१९ मध्ये राज्यात भाजप व शिवसेनेची युती फिस्कटली होती. तथापि, पालिकेत भाजप व शिवसेना युती कायम होती.

अतिक्रमणाचा मुद्दा निवडणुकीत ठरेल कळीचा...
वाढते अतिक्रमण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मोहननगर, आनंदनगर, गोकुळनगर, महसूलनगर, महसूल कॉलनीमध्ये अतिक्रमण वाढत आहे. व्यंकटेशनगर, शिवाजीनगर, आदिवासी कॉलनी, कारखाना कॉलनी, जिजाऊनगर, बोरबन, चरडेनगर यासह अनेक प्रभागात रस्ता, नाली आदी मूलभूत सुविधा मिळाल्या नाही. त्याचाही त्रास राजकीय पक्षांना होणार आहे.

भाजपमध्ये आजी-माजी आमदारांचे गट
- भाजपच्या दोन आजी व माजी आमदारांचे प्रबळ गट निर्माण  झाले आहे. भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष  यांना मानणारा एक गट आहे. या दोन्ही गटात चांगलीच धुसफूस सुरू आहे. भाजपमधील गटातटाचे राजकारण व अंतर्गत धुसफुशीचा परिणाम पालिकेच्या राजकारणावर दिसून येणार आहे. अंतर्गत बंडाळी शमविण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाची चांगलीच  दमछाक होणार असल्याचे संकेत आहे. इतरही पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी होत आहे. त्यातून उमेदवारी देताना नेतृत्वाच्या नाकीनऊ येणार आहे. 

तिसरी आघाडी बिघडविणार समीकरण
- पालिकेच्या निवडणुकीत अनेक पक्ष रिंगणात उतरणार असले तरी खरी लढत मात्र भाजप, शिवसेना, काँग्रेस, एमआयएम आणि नव्यानेच निर्माण झालेल्या तिसऱ्या आघाडीत होण्याची शक्यता आहे. 
- राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार, वंचित आघाडी यांचीही अस्तित्वासाठी धडपड सुरू आहे. पालिकेच्या राजकारणात आजपर्यंत काँग्रेस, भाजप, शिवसेना यांनीच अनेक वर्षांपासून सत्ता उपभोगली आहे. मात्र, आता अनेकांना आरक्षण बदल झाल्यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.
- काही नवीन युवक व महिलांना आरक्षणाचा फायदा मिळणार आहे. त्यादृष्टीने नवयुवक आणि महिलांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भागातील जनतेशी संपर्क वाढविला जात आहे. 
- आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे गणित बिघडले आहे. मात्र, पक्षीय राजकारणामुळे त्यांनी आपला मोर्चा इतर प्रभागाकडे वळविला आहे. 

सर्वच पक्ष लागले कामाला
राज्यातील काही पालिकांची निवडणूक जाहीर होवून स्थगित झाली आहे. येथेही कोणत्याही क्षणी निवडणूक घोषित होऊ शकते. हे लक्षात घेऊन सर्व प्रमुख पक्षांनी राजकीय बैठका घेऊन हालचालींना वेग दिला आहे. त्यामुळे आमचा पक्ष किती चांगला आहे व आमची सत्ता आल्यानंतर कशी कामे करू शकतो, ही भूमिका मतदारांना पटवून सांगण्यास सुरूवात झाली आहे. आपापल्या परीने काँग्रेस,  भाजप, शिवसेना, एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार, वंचित बहुजन आघाडी यासह नव्यानेच निर्माण झालेल्या तिसऱ्या आघाडीसह अपक्षही जोमाने कामाला लागले आहे. तिसरी आघाडी सर्व प्रस्थापित पक्षांना डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसत आहे. शहरात नव्यानेच निर्माण झालेल्या तिसऱ्या आघाडीत अनेक होतकरू तरुणांचा समावेश आहे. 
 

 

Web Title: Challenge of internal rebellion before BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा