वन्यजीवांच्या नावाखाली बोगस बंधारे

By Admin | Updated: May 25, 2014 23:53 IST2014-05-25T23:53:09+5:302014-05-25T23:53:09+5:30

वन्यजीवांना जंगलातच पाणी मिळावे, त्यांना गावाकडे यावे लागू नये म्हणून लाखो रुपये खर्च करून यवतमाळ वनवृत्तात मोठय़ा प्रमाणात बंधारे बांधले गेले. परंतु त्या बंधार्‍यांमध्ये एक थेंबही पाणी शिल्लक

Bogus bunds in the name of wildlife | वन्यजीवांच्या नावाखाली बोगस बंधारे

वन्यजीवांच्या नावाखाली बोगस बंधारे

यवतमाळ : वन्यजीवांना जंगलातच पाणी मिळावे, त्यांना गावाकडे यावे लागू नये म्हणून लाखो रुपये खर्च करून यवतमाळ वनवृत्तात मोठय़ा प्रमाणात बंधारे बांधले गेले. परंतु त्या बंधार्‍यांमध्ये एक थेंबही पाणी शिल्लक नसल्याने त्यातील बोगसपणा उघड झाला आहे.

यवतमाळ वनवृत्तात आणि विशेषत: यवतमाळ, पांढरकवडा वनविभागात गेल्या काही वर्षात मोठय़ा प्रमाणात बंधारे बांधले गेले. उन्हाळ्यात वन्यजीवांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे हा त्यामागील हेतू. परंतु आज वन्यजीवांना पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे रस्त्यावर येऊन वन्यजीवांचा अपघाती मृत्यू होतो आहे. आर्णी तालुक्यात दोन दिवसांपूर्वी अशाच एका अस्वलाचा बळी गेला. वन्यजीव गावाकडे का फिरकले म्हणून शोध घेतला असता वन खात्याने जंगलामध्ये बांधलेले बंधारे कोरडे पडले असल्याचे कारण पुढे आले. या बंधार्‍यांवर शासनाच्या विविध विभागातून निधी खर्च केला गेला. त्याचे माध्यम केवळ वन खाते होते. रोजगार हमी योजनेतूनही मोठय़ा प्रमाणात बंधारे बांधले गेले. परंतु बहुतांश बंधारे व्यर्थ ठरले आहे. त्यात एक थेंबही पाणी नाही.

मुळात बंधार्‍यांच्या या कामात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. बंधार्‍यासाठी जागेची निवडच चुकीच्या पद्धतीने केली गेली. त्यामुळे बंधार्‍याचे काम पूर्ण झाल्यानंतरही तेथे पाणी साचले नाही.

राजकीय नेते व कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी बंधार्‍यांची ही कामे केली गेली. त्यात वनखात्यासह संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनीही आपले हात धुवून घेतले. बंधारे बांधताना नियम धाब्यावर बसविले गेले. या बंधार्‍यामध्ये दोन हेक्टर क्षेत्र पाण्याखाली यावे, अशी कमाल र्मयादा असताना केवळ राजकीय नेत्यांना खूष करण्यासाठी प्रत्यक्षात चार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आणल्याचे दाखविले गेले. गेल्या काही वर्षात वनांमधील बंधार्‍यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले गेले. नियमानुसार केवळ वन्यजीवांसाठी जंगलांमध्ये तलाव बांधणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात नियमाचे उल्लंघन करून ते लोकांसाठीही बांधले गेले. पर्यायाने जंगलांमध्ये मानवी संचार वाढला. त्यातूनच शिकारीच्या घटना वाढून वन्यजीव धोक्यात आले.

बंधार्‍यांच्या कामात भ्रष्टाचाराच्या मोठय़ा प्रमाणात तक्रारी असूनही वन प्रशासनाने त्याच्या चौकशीची तसदी घेतली नाही. वास्तविक बंधार्‍यांची चौकशी करणे कठीण नाही.

सॅटेलाईट नकाशाद्वारे वन प्रशासनाला आपल्या कक्षात बसूनही कोणत्या बंधार्‍यात पाणी दिसते हे पाहणे शक्य आहे. मात्र चौकशीची आणि गैरप्रकार खणून काढून त्यात हात ओले केलेल्यांना शिक्षा करण्याची मानसिकता सध्या तरी वन प्रशासनाकडे नसल्याचे दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Bogus bunds in the name of wildlife