शिधापत्रिका व रेशनच्या धान्यासाठी परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 06:00 AM2019-08-25T06:00:00+5:302019-08-25T06:00:16+5:30
अन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यानंतर प्राधान्यक्रमात आपले नाव यावे यासाठी नागरिकांची तहसील कार्यालयात गर्दी होत आहे. तसेच नवीन कार्ड काढण्यासाठी आणि नावे टाकण्यासाठी तसेच जीर्ण झालेले कार्ड बदलून घेण्यासाठी झुंबड उडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिधापत्रिका आणि रेशनवरील धान्यासाठी गरजूंची परवड सुरू आहे. यवतमाळ तहसील कार्यालयात सुरू असलेल्या या प्रकाराविरूद्ध मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेलफेअरने धडक दिली. या कार्यालयात सुरू असलेला दलालांचा गोंधळ थांबविण्यासाठी त्यांनी मोहीम हाती घेतली आहे. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार शैलेश काळे यांना देऊन कारवाईची मागणी केली.
अन्न सुरक्षा कायदा लागू झाल्यानंतर प्राधान्यक्रमात आपले नाव यावे यासाठी नागरिकांची तहसील कार्यालयात गर्दी होत आहे. तसेच नवीन कार्ड काढण्यासाठी आणि नावे टाकण्यासाठी तसेच जीर्ण झालेले कार्ड बदलून घेण्यासाठी झुंबड उडत आहे. मात्र तहसील कार्यालयात याविषयी योग्य आणि समाधानकारक माहिती दिली जात नाही. खिडकी क्र.८ चा कर्मचारी नवीन शिधापत्रिकेसाठी लागणारा नमूना अर्ज-१ उपलब्ध नसल्याचे सांगतो. बाहेर असलेल्या झेरॉक्स सेंटरमध्ये हा अर्ज मिळते अशी सूचना केली जाते. याठिकाणी पाच रुपये मोजावे लागते. वास्तविक नमूना अर्ज-१, ८, ९, १८ हे अर्ज शासकीय कार्यालयातच मिळायला पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. शिधापत्रिकेसाठी गरजूंना अत्यंत किचकट आणि नानाविध समस्यांचा सामना करावा लागतो. ही बाब एमपीजेचे जिल्हाध्यक्ष प्रा. सैयद मोहसीन यांनी तहसील प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. नवीन रेशनकार्ड, नूतनीकरण, जीर्ण झालेले रेशन कार्ड, नावे समाविष्ट करणे आदी बाबींसाठी नागरिकांची होणारी परवड थांबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी एमपीजेचे शहर अध्यक्ष राशेद अनवर, ग्राहक संरक्षक समितीचे जिल्हा प्रमुख प्रशांत कुºहाडकर, शेख जुनैद, अक्रम मवाल, अजित बोरकर, अ. रफिक, शिवा आडे, अतिक शेख, विनोद मिरासे, मो. साजिद, ब्रह्मनंद काळे, मकसूद अली आदी उपस्थित होते.
दलालांची कामे लवकरच मार्गी लागतात
यवतमाळ तहसील कार्यालयात दलालांची कामे लवकरच होतात. हजार ते १५०० रुपये नागरिकांकडून उकळले जाते. नवीन कार्ड मिळवून देण्यासाठी हा दर दलालांनी निश्चित केला आहे. सामान्य नागरिक दिवसभर रांगेत उभे राहूनही कार्ड मिळत नाही. दलालाच्या माध्यमातून मात्र विनाविलंब कार्ड आणून दिले जाते.