अहमदनगर - अपघात झाला की अपघातग्रस्तांना मदत करायचे सोडून त्यांच्या वस्तू पळवणे, चोरी करणे यासारख्या घटनांमुळे माणुसकी आता नावापुरतीच उरली आहे. नगर-दौंड महामार्गावरील अपघातावेळी याचा प्रत्यय आला. चालक, मदतीची याचना करत असतानाही रस्त्यावरील हावराटांनी द्राक्षांचा ट्रक लुटल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोळगावहून नाशिकच्या दिशेने सुमारे दहा टन द्राक्षे घेऊन जात असलेला ट्रक महामार्गावर पलटी झाला. अपघातानंतर मदत करण्याऐवजी लोकांची द्राक्षे पळवण्यासाठी एकच झुंबड उडाली.