वाशिम जिल्हयातील तीन आश्रमशाळांंची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 17:18 IST2018-11-10T17:18:37+5:302018-11-10T17:18:54+5:30
वाशिम: राज्यशासनाच्या आदिवासी विकास विभागाने शासकीय आश्रमशाळांत विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

वाशिम जिल्हयातील तीन आश्रमशाळांंची होणार तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्यशासनाच्या आदिवासी विकास विभागाने शासकीय आश्रमशाळांत विविध सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत राज्यातील शासकीय आश्रमशाळांतील सुविधांची तपासणी करण्यात येत असून, यात वाशिम जिल्ह्यातील तीन शाळांचा समावेश आहे. या संदर्भातील परिपत्रक ६ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आले असून त्या अनुषंगाने जिल्हयातील तीन शाळांची तपासणी होणार आहे.
स्वच्छ भारत, स्वच्छ शाळा हा कार्यक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आदिवासी विकास विभागांतर्गत येणाºया शासकीय आश्रमशाळेतील पाणी पुरवठा, स्वच्छता व्यवस्थेमधील दुरुस्ती व आवश्यकतेनुसार नवीन बांधका करणे, तसेच स्वयंपाकगृह, भोजनकक्ष, कोठीगृहे, वीजपुरवठा, आदि सुविधांमध्ये वाढ करणे, तसेच नवीन सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने ७ एप्रिल २०१७ च्या परिपत्रकान्वये विशेष दुरुस्ती कार्यक्रम राबविण्यात आला. सध्याही शासकीय आश्रमशाळेतील भौतिक व मुलभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने विशेष दुरुस्ती व कायापालट अभियान राबविण्यात येत असून, सुविधा नियमित मापदंडानुसार उपलब्ध होणे आवश्यक असताना अद्याप काही आश्रमशाळांत या सुविधा शाश्वतपण उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे.
या पृष्ठभूमीवर शासनाने आश्रमशाळांची तपासणी करण्याचे ठरविले असून, या अंतर्गत जिल्ह्यातील शेलुबाजार, मुसळवाडी आणि किन्हीराजा येथील आश्रमशाळांची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये समस्या आढळल्यास त्या सुधारण्यात येणार आहेत.