शाळा प्रवेश प्रक्रिया आता ‘लॉकडाऊन’ उठल्यानंतरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 10:27 IST2020-05-08T10:27:22+5:302020-05-08T10:27:50+5:30

लॉकडाऊन उठल्यानंतर किंवा शासनाच्या निर्देशानुसारच पुढील सत्रासाठी अधिकृत प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती जि.प. शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली आहे.

The school admission process is now only after the lockdown | शाळा प्रवेश प्रक्रिया आता ‘लॉकडाऊन’ उठल्यानंतरच

शाळा प्रवेश प्रक्रिया आता ‘लॉकडाऊन’ उठल्यानंतरच

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रणासाठी लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केल्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी शाळा २२ मार्चपासून बंद ठेवण्यात आल्या. शासनाने निकालाची तारीख निश्चित केली नसली तरी, शासनाच्याच निर्देशानुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे पाठ्यक्रमावर आधारीत मुल्यमापन करून पहिली ते आठवीपर्यंतच्या ६९, ८८९ विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्यात आली आहे. तथापि, लॉकडाऊन उठल्यानंतर किंवा शासनाच्या निर्देशानुसारच पुढील सत्रासाठी अधिकृत प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती जि.प. शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली आहे.
वाशिम जिल्ह्यात शासकीय शाळांत पहिली ते आठवीपर्यंतचे ४४०६२, तर खासगी शाळांत २५ हजार ८२७ विद्यार्थी गतसत्रात प्रवेशित होते. सत्र अंतीम टप्प्यात असतानाच कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी शासनाने लॉकडाऊन जारी केले, तर राज्य शासनाने सर्व शाळा बंद ठेवण्याच्या सुचनाही दिल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालांत परिक्षा रखडल्या. आता मे महिना अर्ध्यावर आला असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मुल्यमापन करून निकाल लावण्याच्या सुचना शासनाने दिल्या होत्या. या सुचनांची अमलबजावणी वाशिम जिल्हा परिषदेकडून करण्यात आली आणि खासगी, तसेच शासकीय शाळांत शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या ६९,८८९ विद्यार्थ्यांचा निकाल आॅनलाईन जाहीर करून त्यांना वर्गोन्नती देण्यात आली. तथापि, पुढील सत्रातील अधिकृत प्रवेश प्रक्रिया लॉकडाऊन उठल्यानंतर किंवा शासनाच्या निर्देशानुसारच राबविण्यात येणार असल्याचे जि.प. शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

गुणपत्रिकाही ‘लॉकडाऊन’नंतरच
गत शैक्षणिक सत्रात पहिली ते आठवीपर्यंतच्या परिक्षा लॉकडाऊनमुळे घेता आल्या नाहीत. आता शासनाच्या निर्देशानुसार आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले असले तरी, या निकालाची कागदपत्रे अर्थात गुणपत्रिका किंवा शाळा सोडल्याचा दाखला लॉकडाऊननंतरच विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शासनाने निकालाची तारीख जाहिर केल्यानंतरही ही प्रक्रिया पार पाडली जाण्याची शक्यता आहे.

शासनाने निकालाची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे पुढील सत्रातील प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू नाही. लॉकडाऊनंतर किंवा शासनाच्या निर्देशानुसारच ही प्रक्रिया पार पाडली जाईल. विद्यार्थ्यांचे निकाल आॅनलाईन जाहीर करून पालकांना त्याबाबत माहिती दिली जात आहे.
- गजानन डाबेराव
प्रभारी उपशिक्षणाधिकारी

Web Title: The school admission process is now only after the lockdown