वाशिम जिल्ह्यात पावसाची विश्रांती; शेतकरी चिंतातूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 18:47 IST2021-06-27T18:47:09+5:302021-06-27T18:47:15+5:30
Rain relief in Washim district; Farmers worried : शेतकरी चिंतातूर झाला असून, दमदार पावसाकडे लक्ष लागून आहे.

वाशिम जिल्ह्यात पावसाची विश्रांती; शेतकरी चिंतातूर
वाशिम : गत आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याने खरिपाची पिके संकटात सापडत आहेत. परिणामी, शेतकरी चिंतातूर झाला असून, दमदार पावसाकडे लक्ष लागून आहे.
गतवर्षातील नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून स्वत:ला सावरत यंदा शेतकरी हे खरीप हंगामासाठी नव्या जोमाने कामाला लागले. यंदा जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ४५० हेक्टरवर पेरणीचे नियोजन असून, सर्वाधिक पेरणी ही सोयाबीनची होणार आहे. आतापर्यंंत जवळपास ६७ टक्के पेरणी आटोपली आहे. गत आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस नसल्याने हलक्या जमिनीतील पिके कोमेजून जात आहेत. मंगरूळपीर, रिसोड, मानोरा तालुक्यातील काही भागात पाऊस झाला तर वाशिम, कारंजा तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. रविवारी गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५.८ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली. सर्वाधिक मंगरूळपीर तालुक्यात २३.७ मिमी झाला. वाशिम तालुक्यात १.२ मीमी, रिसोड तालुक्यात ०.४, मानोरा तालुक्यात ९.३ तर कारंजा तालुक्यात ३.८ मीमी पाऊस झाला. मालेगाव तालुक्यात पाऊस झाला नसल्याची नोंद आहे. बिजांकूर जमिनीबाहेर आले असून, पिकांना सध्या पावसाची नितांत गरज आहे. वाशिम व कारंजा तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस असल्याने शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे.
आतापर्यंत झालेला एकूण पाऊस
तालुका पाऊस (मीमी)
वाशिम १८४
रिसोड २२५
मालेगाव २०४
मंगरूळपीर २४२
मानोरा २५७
कारंजा १३७
दहा दिवसांपूर्वी सर्व पेरणी आटोपली आहे. आता पाऊस नसल्याने पिके कोमेजून जात आहेत. येत्या दोन, तीन दिवसात पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचे सावट आहे.
- पांडुरंग सोळंके,
शेतकरी, नागठाणा ता.वाशिम
गतवर्षीच्या नैसर्गिक संकटातून सावरत यंदा शेतकºयांनी मोठ्या उत्साहाने पेरणी केली. ९० टक्के पेरणी आटोपली आहे. आता पाऊस नसल्याने चिंता वाढली आहे.
- हरिष चौधरी
शेतकरी, पार्डीटकमोर ता.वाशिम