एक घास ‘भुकेल्यांसाठी’ : वाशिमच्या युवकांनी चालविला उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 13:23 IST2019-09-15T13:22:26+5:302019-09-15T13:23:05+5:30
रेल्वेस्थानक, आंबेडकर चौक , जुनी जिल्हा परिषद परिसर यासह ज्या भागात झोपडपट्टीत, रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना पोटभर अन्न दिल्या जाते.

एक घास ‘भुकेल्यांसाठी’ : वाशिमच्या युवकांनी चालविला उपक्रम
नंदकिशोर नारे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सामाजिक कार्य करण्याची ओढ असली की, कोण काय कार्य करेल सांगता येत नाही. असाच काहीसा उपक्रम तिरुपती सिटीमधील युवकांनी चालविला आहे. भुकेलेल्यांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी जावून पोटभर जेवण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे आता ज्यांची एक दिवस जेवणाची व्यवस्था झाली ते ही मोठया आतुरतेने वाट पाहताना दिसून येत आहेत.
गत सहा महिन्यापूर्वी तिरुपती सिटीमधील काही युवक, नागरिक छोटेखानी कार्यक्रमानिमित्त एकत्र आले असता काही तरी सामाजिक उपक्रम राबविण्याचा विचार केला. त्यावेळी विविध विषयांवर चर्चा होवून अखेर दर रविवारी घरोघरी ताजे अन्न तयार करुन ते एकत्र करुन भुकेलेल्यांना देण्याचा उपक्रमावर शिक्कामोर्तब झाला. त्यानुसार या युवकांचा असलेला व्हॉटस अॅप गृपवर मॅसेज टाकला जातो. विशेष म्हणजे रविवारी काय मेनू राहणार याची सूचना सुध्दा गृपमध्ये टाकून दिल्या जाते. या रविवारी पुरी व भाजी बनवून एकत्र करायचा मॅसेज पडल्याबरोबर संध्याकाळी ७ वाजेपर्यंत राधाकृष्ण मंदिराजवळ ते एकत्रित केली जाते. त्यानंतर आॅटोमध्ये हे अन्न घेवून बसस्थानक, रेल्वेस्थानक, आंबेडकर चौक , जुनी जिल्हा परिषद परिसर यासह ज्या भागात झोपडपट्टीत, रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना पोटभर अन्न दिल्या जाते. त्यानंतरही अन्न शिल्लक राहिल्यास अनाथालय, आश्रमशाळा, वसतिगृहामध्ये देवून एक चांगले कार्य हाती घेण्यात आले आहे.
तिरुपती सिटी युवक मंडळांना हा उपक्रम करण्याची प्रेरणा जे मिळाली ते एका कार्यक्रमातूनच. एका कार्यक्रमामध्ये मोठया प्रमाणात अन्न शिल्लक राहिल्याने ते न फेकून देता ते गोरगरिबांमध्ये वाटून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी हे युवक परिसरात अन्न वाटपासाठी गेले असता अनेक जण धावून आले. हे पाहून दर रविवारी हा उपक्रम आपण राबविल्यास अन्नदान ही होईल आणि गोरगरिबांच्या पोटाची खळगी सुध्दा भरेल. त्यामुळे हा निर्णय गत ४ ते ५ महिन्यापूर्वी घेण्यात आला. यामध्ये कोणताही खंड न पडता सतत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची ज्यांना दर रविवारी अन्न मिळते ते आतुरतेने आपली भांडे घेवून या युवकांची प्रतिक्षा करतांना दिसून येतात. तिरुपती युवक मंडळांनी सुरु केलेल्या या उपक्रमामध्ये महिलांचाही मोठया प्रमाणात सहभाग व सहकार्य मिळत आहे. गृपवर मॅसेज पडल्याबरोबर युवकांकडून घरी आजचा मेनू कळविण्यात येतो. त्यानुसार महिला वेळेच्या आत ते तयार करुन ठेवतात. युवकांनी सुरु केलेला हा उपक्रम खरोखरचं कौतूकास्पद आहे. ज्यावेळी गोरगरिब, भुकेले या युवकांकडून अन्न घेतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये या युवकांबाबत कृतज्ञता दिसून येते.