संगणक शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 16:10 IST2018-12-29T16:10:30+5:302018-12-29T16:10:50+5:30
वाशिम : शासनाने लाखो रुपयांचा निधी खर्चून प्रत्येक शासकीय शाळेत संगणकांची सोय उपलब्ध करून दिली. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळायला लागले होते. मात्र, १५ डिसेंबरला संगणकीय शिक्षकांची सेवा संपुष्टात आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

संगणक शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासनाने लाखो रुपयांचा निधी खर्चून प्रत्येक शासकीय शाळेत संगणकांची सोय उपलब्ध करून दिली. यामाध्यमातून विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळायला लागले होते. मात्र, १५ डिसेंबरला संगणकीय शिक्षकांची सेवा संपुष्टात आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या शिक्षकांच्या सेवेस मुदतवाढ द्यावी किंवा संबंधितांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे २८ डिसेंबर रोजी निवेनाव्दारे केली.
ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंतच्या विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे व गुणवत्ता वाढावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळेवर एका ‘आयसीटी’ संगणक शिक्षकाची नेमणूक केली. तसेच प्रत्येक शाळेवर २० ते २५ लाखांचा खर्च करून संगणक उपलब्ध करून दिले. मात्र, संबंधित शिक्षकांची सेवा १५ डिसेंबर रोजी संपुष्टात आल्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शाळांमध्ये शिक्षकच राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून संगणक धूळ खात पडून आहेत. ही बाब लक्षात घेवून संगणक शिक्षकांच्या सेवेस मुदतवाढ द्यावी किंवा त्यांना कायमस्वरूपी शासनसेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी शिक्षक शेखर भोयर यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली.