पाण्यासाठी नागरिकांची भरउन्हात भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 18:05 IST2021-05-11T18:05:21+5:302021-05-11T18:05:30+5:30

Water Scarcity : महिलांना एक कि.मी.अंतरावरुन घाटरस्ता चढून डोईवर हंडा घेऊन पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे.

Citizens wandering in the sun for water | पाण्यासाठी नागरिकांची भरउन्हात भटकंती

पाण्यासाठी नागरिकांची भरउन्हात भटकंती

- यशवंत हिवराळे
राजुरा- मालेगाव तालुक्यातील खैरखेडा गावात सध्या स्थितीत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून महिलांना एक कि.मी.अंतरावरुन घाटरस्ता चढून डोईवर हंडा घेऊन पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाल्याने पशूपालक त्रस्त झाले आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष पूरवुन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी खैरखेडा ग्रामस्थांमधून होत आहे.

खैरखेडा गावात पाणी टंचाई आणि उन्हाळ्याच्या दिवसात गावात टॅंकर हे जणू गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून समीकरण बनले आहे. आदिवासी व बंजारा समाज बहुल लोकवस्ती असलेल्या खैरखेडा गावाचा संपूर्ण भुभाग खडकाळ डोंगरदऱ्या व कडा कपारींनी वेढलेला आहे. गावात पाचशे फुटावर कूपनलिका घेऊनही त्याला पाण्याचा थेंबही उपलब्ध होत नसल्याने या गावात सार्वजनिक तथा खाजगी स्वरूपाची एकही कूपनलिका किंवा पानवठा नाही. गावात एकही हातपंप वा पानवठा नसलेलं बहुदा हे जिल्ह्यातील एकमेव गाव असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच या गावातील जनतेची तहान दुषीत पाण्यावर भागवली जाते. बरेचदा नदीपात्रातील ज्या डोहावर कुत्रे,गुरे पाणी पितात, त्याच डोहानजीक झीरि खोदून त्यातील दुषीत पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत असल्याचे वास्तव आहे. महिलांनाही धुणे धुण्यासाठी गाव परिसरातील दोन कि.मी.अंतरावरील नदी पात्रातील डोहावर पायपीट करून भर उन्हात जाव लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे ठरत आहे. उपाययोजना शून्य असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.

Web Title: Citizens wandering in the sun for water