वाशिम जिल्ह्यात दोन दिवसांत पकडल्या ७८ वीज चोऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 17:42 IST2018-08-08T17:41:28+5:302018-08-08T17:42:30+5:30
येथील महावितरणने सोमवार, ६ आॅगस्टपासून धडक मोहिमेअंतर्गत सहाही शहरांमधील ७८ ठिकाणच्या वीज चोऱ्या पकडल्या.

वाशिम जिल्ह्यात दोन दिवसांत पकडल्या ७८ वीज चोऱ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील शहरी भागात गेल्या काही महिन्यांपासून वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे. ही बाब लक्षात घेवून येथील महावितरणने सोमवार, ६ आॅगस्टपासून धडक मोहिमेअंतर्गत सहाही शहरांमधील ७८ ठिकाणच्या वीज चोऱ्या पकडल्या. संबंधितांवर दंड आकारण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर.जी.तायडे यांनी बुधवारी दिली.
वीज चोरी आणि वीज गळती या दोन समस्यांनी महावितरण पुरते हैराण झाले आहे. या समस्यांचा थेट परिणाम नियमित विद्यूत देयक अदा करणाºया ग्राहकांवरही होतो. याशिवाय महावितरणलाही आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे वीज चोरट्यांची कुठलीच हयगय न करता त्यांच्याविरूद्ध दंडात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश अधीक्षक अभियंता व्ही.बी. बेथारिया यांनी दिले. त्यानुसार, सोमवारपासून महावितरणने जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा अशा सहाही शहरांमध्ये वीज चोरट्यांवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने धडक मोहिम हाती घेतली आहे. यादरम्यान सोमवारी २४ आणि मंगळवारी ५४ ग्राहक वीज चोरी करताना आढळून आले. संबंधित ग्राहक कधीपासून वीज चोरी करित होते, त्याची चाचपणी सद्या केली जात असून कायद्यातील तरतूदीनुसार संबंधितांना दंड आकारण्यात येणार आहे. तो साधारणत: ४ ते ५ लाख रुपयांपर्यंत असणार आहे. वीज चोरी करणारे जे ग्राहक दंड अदा करणार नाहीत, त्यांच्याविरूद्ध फौजदारी कारवाई केली जाईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता तायडे यांनी दिली.