कलहामुळे रिपाइंची संधी गेली

By Admin | Updated: April 24, 2016 02:05 IST2016-04-24T02:05:47+5:302016-04-24T02:05:47+5:30

दोन गटातील वादामुळे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाची वसई विरार महानगरपालिकेत स्विकृत नगरसेवक मिळवण्याची संधी हुकली आहे. एका गटाने उमेदवारी अर्ज दाखल केला होता

There was an opportunity for ripayans because of balsamy | कलहामुळे रिपाइंची संधी गेली

कलहामुळे रिपाइंची संधी गेली

- शशी करपे,  वसई

दोन गटातील वादामुळे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाची वसई विरार महानगरपालिकेत स्विकृत नगरसेवक मिळवण्याची संधी हुकली आहे. एका गटाने उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र बहुजन विकास आघाडीच्या गटनेत्याची शिफारस नसल्याने उमेदवारी अर्ज बाद झाला.
बहुजन विकास आघाडीने विधानसभा आणि वसई विरार महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) शी युती केली होती. यावेळी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी प्रचारातही भाग घेतला होता. त्यावेळी झालेल्या बैठकीत महानगरपालिका निवडणुकीत दोन जागा आणि एक स्विकृत नगरसेवकपद आरपीआयला देण्याचे ठरले होते. त्यानुसार पालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने माजी नगरसेवक पांडुरंग इंगळे आणि रेश्मा जाधव यांना उमेदवारी दिली होती. मात्र, हे दोन्ही नगरसेवक प्रत्यक्षात बहुजन विकास आघाडीचे पूर्वीचेच कार्यकर्ते असल्याने आरपीआयने आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडे तक्रारही केली होती. पण, स्विकृत नगरसेवक आणि इतर कमिट्यांमध्ये आरपीआय कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाईल, असा शब्द दिला गेल्यानंतर आरपीआयचे समाधान झाले होते.
स्विकृत नगरसेवकपद मिळावे यासाठी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष ईश्वर धुळे आणि एस. एस. कांबळे यांच्यात चुरस होती. दोन्ही गटातील पदाधिकारी त्यासाठी आमदार ठाकूर यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. खासदार आठवले यांनी आमदार ठाकूर यांची भेट घेऊन धुळे यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतरही कांबळे गटाने ठाकूरांकडे तगादा लावून स्विकृत नगरसेवकपदाचा वाद भिजत ठेवला होता. आरपीआयमध्ये एकमत होत नसल्याने स्विकृत नगरसेवक पदासाठी आघाडीने अजीव पाटील, प्रफुल्ल साने, इक्बाल हुद्दा, डॉ. प्रवीण क्षिरसागर आणि संतोष वळवईकर यांच्या नावाची शिफारस केली होती. त्याचवेळी ईश्वर धुळे यांनीही अर्ज दाखल केला होता. मात्र, आघाडीच्या गटनेत्याची शिफारस नसल्याने धुळे यांचा अर्ज बाद होऊन आघाडीचे पाचही सदस्य बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे स्विकृत नगरसेवकपद मिळवण्याची आरपीआयची संधी सध्यातरी हुकली आहे.

आरपीआयमध्ये कोणतेही गट नसून पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी माझ्या नावाची लेखी शिफारस केली होती. त्यामुळे आघाडीने आपला शब्द पाळायला हवा होता. नगरसेवकपदाची तिकीटे आमच्या कार्यकर्त्यांऐवजी त्यांच्याच दोन कार्यकर्त्यांना देऊन आरपीआयच्या कोट्यातील आहेत असे दाखवून त्यांना आघाडीच्या तिकीटावर निवडून आणले गेले. त्यानंतर स्वीकृत नगरसेवकपदाची निवडणूक होत असल्याचे कळवले नाही. स्वीकृत नगरसेवकपदासाठी अर्ज भरले जात असल्याची माहिती उशिराने मिळाली. त्यानंतर पालिकेत अर्ज भरण्यासाठी गेलो होतो. पण, आघाडीच्या गटनेत्याची शिफारस न मिळाल्याने माझा अर्ज बाद झाला. आमदार ठाकूरांनी त्यानंतरही स्वीकृत नगरसेवकपद देण्याचा शब्द दिला आहे. त्यांच्याकडून तो पाळला जाईल अशी अपेक्षा आहे.
-ईश्वर धुळे, जिल्हाध्यक्ष (आरपीआय)

दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जर ठरले असेल तर आमचे नेते दिलेला शब्द नक्की पाळतील. याबाबतीत वरिष्ठ पातळीवरच निर्णय घेतला जाईल.
-उमेश नाईक, उपमहापौर

Web Title: There was an opportunity for ripayans because of balsamy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.