वसईतील 'त्या' १३ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गूढ १५ वर्षांनी उलगडणार; उच्च न्यायालयाचा तपास CBI कडे सोपवण्याचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:42 IST2026-02-20T12:40:14+5:302026-02-20T12:42:27+5:30
ही मुलगी आठवीत शिकत होती. २८ ऑगस्ट २०१० रोजी शाळेने तुंगारेश्वर डोंगरावर स्काउट्स अँड गाइड्स शिबिर आयोजित केले होते. तेथून ती बेपत्ता झाली होती. नंतर तिचा मृतदेह आढळला होता.

वसईतील 'त्या' १३ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गूढ १५ वर्षांनी उलगडणार; उच्च न्यायालयाचा तपास CBI कडे सोपवण्याचा आदेश
नालासोपारा : वसईच्या तुंगारेश्वर जंगलात मृतावस्थेत आढळलेल्या एका १३ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे गूढ १५ वर्षांनंतर उलगडण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. सारंग कोतवाल आणि न्या. श्रीरंग शिरसाट यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची चौकशी नव्याने सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. ॲड. योगेश राऊळ यांनी याचिकेद्वारे चौकशीची मागणी केली होती.
ही मुलगी आठवीत शिकत होती. २८ ऑगस्ट २०१० रोजी शाळेने तुंगारेश्वर डोंगरावर स्काउट्स अँड गाइड्स शिबिर आयोजित केले होते. तेथून ती बेपत्ता झाली होती. नंतर तिचा मृतदेह आढळला होता.
काय घडले होते?
या मुलीच्या मृतदेहाचे नवघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तीन डॉक्टरांच्या पॅनलने शवविच्छेदन केले होते. तिच्या फुप्फुसात पाणी आढळले नव्हते.
पीडितेच्या गुप्तांगांवर व मांड्यांवर दुखापतीच्या खुणा आढळल्या होत्या. त्या अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे तसेच तिची हत्या केल्याचा निष्कर्ष काढला होता. माणिकपूर पोलिसांनी या अहवालाच्या आधारे बलात्कार, हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला होता.
मात्र, जे. जे. रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिचा मृत्यू अपघाती होता. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्धचा खुनाचा गुन्हा मागे घेऊन अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता.