ऐतिहासिक विक्रम ! ४४ आयर्नमॅन किताबांसह विरारचा हार्दिक दयानंद पाटील ठरला भारताचा नंबर १ आयर्नमॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 10:51 IST2026-05-17T10:51:05+5:302026-05-17T10:51:16+5:30
Nalasopara News: क्रीडा जगतातून भारतासाठी एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील विरार शहराचे सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एन्ड्युरन्स ॲथलिट हार्दिक दयानंद पाटील यांनी व्हिएतनाम येथे आयोजित अत्यंत खडतर अशी फुल आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

ऐतिहासिक विक्रम ! ४४ आयर्नमॅन किताबांसह विरारचा हार्दिक दयानंद पाटील ठरला भारताचा नंबर १ आयर्नमॅन
- मंगेश कराळे
नालासोपारा - क्रीडा जगतातून भारतासाठी एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील विरार शहराचे सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एन्ड्युरन्स ॲथलिट हार्दिक दयानंद पाटील यांनी व्हिएतनाम येथे आयोजित अत्यंत खडतर अशी फुल आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. हा हार्दिक पाटील यांचा ४४ वा यशस्वी आयर्नमॅन किताब असून, या विक्रमी कामगिरीसह त्यांनी सर्वात जास्त आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारे पहिले भारतीय होण्याचा बहुमान मिळवला आहे.
हार्दिक यांच्या या विक्रमी यशामागील संघर्ष खऱ्या अर्थाने अचंबित करणारा आहे. स्पर्धेपूर्वी त्यांच्या चक्क दोन बरगड्या फ्रॅक्चर झाल्या होत्या. यामुळे गेल्या चार आठवड्यांपासून ते सक्तीच्या पूर्ण विश्रांतीवर होते. अशा स्थितीत कोणताही सराव नसताना आणि असह्य वेदना होत असतानाही, त्यांनी आयर्नमॅन सारख्या जगातील सर्वात कठीण स्पर्धेत उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. अफाट मानसिक कणखरतेच्या जोरावर त्यांनी शारीरिक वेदनांवर मात करत हे अशक्यप्राय यश मिळवले आहे.
शारीरिक दुखापत आणि सरावाचा अभाव असतानाही, हार्दिक पाटील यांनी व्हिएतनाम येथील ही ४४ वी फुल आयर्नमॅन स्पर्धा १६ तास, १५ मिनिटे आणि १७ सेकंदात पूर्ण करत सर्वांना थक्क केले. कोणत्याही विश्रांतीशिवाय सलग १६ तासांहून अधिक काळ चाललेला हा थरार त्यांच्या अतुलनीय जिद्दीचे आणि 'नेव्हर गिव्ह अप' वृत्तीचे प्रतीक आहे.
यापूर्वी भारतातील एका खेळाडूच्या नावे ४३ आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करण्याचा विक्रम होता. हार्दिक पाटील यांनी आपल्या ४४ व्या यशस्वी मोहिमेसह तो जुना विक्रम मोडीत काढला असून, भारतीय क्रीडा इतिहासामध्ये स्वतःचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. आता ते अधिकृतपणे भारतातील नंबर १ आयर्नमॅन ठरले आहेत.
फुल आयर्नमॅन ही जगातील सर्वात कठीण एकदिवसीय क्रीडा स्पर्धा मानली जाते. यामध्ये स्पर्धकाला ठराविक वेळेच्या मर्यादेत ३.८ किमी समुद्रात पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि त्यानंतर लगेचच ४२.२ किमीची पूर्ण मॅरेथॉन धावणे असे एकूण २२६ किमीचे अंतर सलग पूर्ण करावे लागते.
मोडक्या बरगड्यांनिशी आणि शून्यातून भरारी घेत हार्दिक पाटील यांनी मिळवलेल्या या जागतिक स्तरावरील विक्रमी कामगिरीमुळे केवळ विरार किंवा पालघर जिल्ह्याचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि भारताचा डंका आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर वाजला आहे. त्यांच्या या अफाट जिद्दीबद्दल लोकप्रतिनिधी, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.