हेडमास्तरांची विद्यार्थ्याला बेल्टने जबर मारहाण, माइकवरून द्यायला लावली कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 23:41 IST2017-09-24T23:40:53+5:302017-09-24T23:41:09+5:30
नालासोपा-यात रॅगिंगमुळे एका शालेय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच एका शाळेतील विद्यार्थ्याने लैंगिक चाळे केल्याचा ठपका ठेऊन मुख्याध्यापकाने त्याला बेल्टने बेदम मारहाण केली

हेडमास्तरांची विद्यार्थ्याला बेल्टने जबर मारहाण, माइकवरून द्यायला लावली कबुली
वसई : नालासोपा-यात रॅगिंगमुळे एका शालेय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच एका शाळेतील विद्यार्थ्याने लैंगिक चाळे केल्याचा ठपका ठेऊन मुख्याध्यापकाने त्याला बेल्टने बेदम मारहाण केली. तसेच माईकवरून हा प्रकार केल्याची कबुली द्यायला लावल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नालासोपारा पूर्वेकडील एव्हरशाईन येथील सेंट नॉलेज कॅम्पस या शाळेत नववीत शिकत असलेल्या जय पाटील या मुलाला मुख्याध्यापक स्टॅनी पिंटो यांनी आपल्या केबिनमध्ये बेल्टने बेदम मारहाण केली. मुलांसमोर तो लैंगिक चाळे करीत असल्याची तक्रार काही मुलांनी करताच संतापलेल्या पिंटो यांनी केबिनमध्ये जयला अमानुष मारहाण केली. त्यानंतर शाळेच्या मैदानात आणून पुन्हा मारहाण केली. इतकेच नाही तर हा प्रकार व त्याला झालेली शिक्षा शाळेतील सर्व मुलांना समजावी यासाठी असा प्रकार केल्याची कबुली त्याला माईकवरून देण्यासही त्यांनी भाग पाडल्याची तक्रार त्याची आई भूमिका पाटील यांनी केली आहे. त्यानुसार त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी जयसोबतच मस्ती करीत असल्याचे कारण दाखवत ऋतुराज धोत्रे आणि शुभम घोसाळ या दोन विद्यार्थ्यांनाही मारहाण केल्याचे पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी त्यांनी कोर्टातून अटकपूर्व जामीन मिळवला आहे. जयला त्वचेचा आजार झाला असून त्यावर औषधोपचारही सुरु आहेत. त्यामुळे त्याच्या गुप्तांगाला खाज आल्यानेच जयने असहय झाल्याने खाजवले. पण, मुख्याध्यापकांनी त्याची बाजू ऐकून न घेताच विक्षिप्त चाळे करीत असल्याच्या तक्रारीवरून जयला बेदम मारहाण केल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे.
रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका विद्यार्थ्याची हत्या झाल्यानंतर डीवायएसपी दत्ता तोटेवाड यांनी आपल्या हद्दीतील सर्व शाळांमधील शिक्षक, कर्मचारी, बस ड्रायव्हर आणि पालकांच्या बैठका बोलावून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहनही केले. शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, बसमध्ये विद्यार्थी सुरक्षित रहावेत यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन केले. कोर्टाच्या निर्देशानुसार विद्याथ्यांच्या सुरक्षिततेचे पालन केले पाहिजे. अन्यथा संबंधित शाळांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही तोटेवाड यांनी यावेळी दिला.