क्षमता १५०० ची, प्रत्यक्ष लाभ २५० हेक्टरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:44 IST2018-10-30T23:43:53+5:302018-10-30T23:44:42+5:30
परिसरातील शेतकऱ्यांना हिरवे स्वप्न दाखवून शेती संपादित करण्यात आली. अवघ्या काही वर्षांच्या कालावधीत धरणही उभे झाले. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात सिंचनाची सोय झाली नाही. कालवे सदोष झाले नसते तर १५०० हेक्टर क्षेत्र लाभ क्षेत्रा खाली आले असते;....

क्षमता १५०० ची, प्रत्यक्ष लाभ २५० हेक्टरला
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : परिसरातील शेतकऱ्यांना हिरवे स्वप्न दाखवून शेती संपादित करण्यात आली. अवघ्या काही वर्षांच्या कालावधीत धरणही उभे झाले. परंतु, पाहिजे त्या प्रमाणात सिंचनाची सोय झाली नाही. कालवे सदोष झाले नसते तर १५०० हेक्टर क्षेत्र लाभ क्षेत्रा खाली आले असते; पण फुटलेल्या पाटचऱ्या, वाढलेली झुडपे तसेच कालव्यांना पडलेले तडे यामुळे प्रत्यक्षात २००-२५० हेक्टर शेती कशीबशी सिंचनाखाली आली असल्याचे बोलले जात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
यावर्षी पाऊस समाधानकारक न झाल्याने मदन उन्नई धरणाची पाणी पातळी पाहिजे तशी वाढली नाही. अशात एक उद्योग कंपनी दिवसरात्र पाण्याचा उपसा करीत आहे. अशावेळी रबी पिकाला पाणी मिळावी म्हणून शेतकऱ्यांनी ओरड होत असताना धरणातून पाणी सोडण्यात आले. सोडण्यात आलेल्या डाव्या-उजव्या कालव्याचे पाणी दैनावस्था झालेल्या कालव्यांमुळे जास्त अंतर कापू शकले नाही. सदर दोन्ही कालव्यांना अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेताला तळ्याचेच स्वरूप आले. इतकेच नव्हे तर आकोली-गिरोली मार्गावरील एसकेएफ गेटमधून पाण्याची संततधार सुरु आहे. त्याकडे संबंधित अधिकाऱ्याचे दुर्लक्ष होत आहे. तसेच क्षीरसमुद्र गावाजवळील धोंडीकर यांच्या शेतानजीक पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. यासह विविध करणांमुळे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने अतिशय अल्प अंतर कापले. शेतकऱ्यांनी मोठ्या धाडसाने यंदा रबी हंगामासाठी जमीन कसली आहे. परंतु, पाणीच शेतापर्यंत पोहोचले नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. यंदा रबी पिकांची लागवड कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सध्या सतावत आहे. कोरड्या दुष्काळाचे सावट असलेल्या वर्धा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.
टेबलवरूनच कालव्यांची पाहणी
कालवा निरिक्षक कधीही कालव्याची पाहणी करीत नसल्याचे शेतकरी सांगतात. इतकेच नव्हे तर ते शेतकºयांशी साधा संवादही साधत नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर शेतकऱ्यांसह नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याच धरणावर पथदिवे बसविले होते. परंतु, विद्युत देयक अदा न करण्यात आल्याने सदर पथदिवे सध्या बंदच आहेत. या प्रकरणी अधिकाºयांच्या बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.