Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 08:56 IST2026-04-13T08:55:18+5:302026-04-13T08:56:13+5:30
Uttar Pradesh Hapur Road Accident News: उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात लग्नाहून परतताना वऱ्हाडाच्या मिनी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण ठार झाले असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात लग्नाहून परतताना वऱ्हाडाच्या मिनी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण ठार झाले असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले असून जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातामुळे दासना आणि गुलावतही या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील धौलाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वरातीच्या बसला भीषण अपघात झाला. भरधाव बस आणि हायड्रा ट्रक यांच्यात झालेल्या या धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादमधील दासना येथून एक वरात बुलंदशहरमधील गुलावतही येथे गेली होती. विवाह सोहळा आटोपून ही वरात बसने परतत असताना कपूरपूर-धौलाना रस्त्यावर हा अपघात घडला. बसचा वेग इतका जास्त होता की, चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस समोरून येणाऱ्या एका हायड्रा ट्रकवर जाऊन आदळली.
हायड्रा ट्रक बसवर उलटला
ही धडक इतकी भीषण होती की नियंत्रण सुटलेला हायड्रा ट्रक थेट बसवरच उलटला. यामुळे बसमधील प्रवासी ट्रकच्या प्रचंड वजनाखाली आणि वाहनाखाली दबले गेले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच हापूरचे पोलीस अधीक्षक मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. सुमारे सहा पोलीस ठाण्यांमधील पोलीस पथकांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू केले. गॅस कटर आणि क्रेनच्या साहाय्याने बसचा पत्रा कापून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
अपघातात सहा जण ठार, ७ गंभीर जखमी
या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर,७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रामा मेडिकल कॉलेज, जीएस मेडिकल कॉलेज आणि धौलाना येथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.