दादा, क्या हुआ तेरा वादा?... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांना प्रश्न
By सदानंद नाईक | Updated: March 30, 2025 17:34 IST2025-03-30T17:34:07+5:302025-03-30T17:34:37+5:30
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, म्हणणाऱ्या अजित पवारांना हर्षवर्धन सपकाळांचा प्रश्न

दादा, क्या हुआ तेरा वादा?... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांना प्रश्न
सदानंद नाईक/ उल्हासनगर : शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, या दादांच्या वक्तव्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी चांगलाच समाचार घेत दादा, क्या हुआ तेरा वादा?’ असा संतप्त प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला.
उल्हासनगर दौऱ्यावर आलेले सपकाळ यांनी नेहरू चौक येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकारांसोबत संवाद साधत पक्षाला पूर्वीचे वैभव आणूनं देऊ असे विधान केले. उल्हासनगर दौऱ्यावर आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शहर पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्याची नेहरू चौक येथील मध्यवर्ती कार्यालयात बैठक घेतली.
एकेकाळी महापालिकेवर सत्ता गाजविणाऱ्या पक्षांचा गेल्या महापालिका निवडणुकीत एकमेव नगरसेवक निवडून आला होता. पक्षाला पूर्वीचे वैभव मिळून देण्यासाठी व पक्ष बांधणीसाठी सपकाळ शहरांत आले होते. पत्रकारा सोबत संवाद साधताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेतकऱ्याला कर्जमाफी नाही. या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. निवडणुकीच्या प्रचारात व जाहिरनाम्यात महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना २१०० रुपये आदी अनेक आश्वासन दिले होते. मात्र १०० दिवसातच महायुतीच्या सरकारला याचा विसर पडला असून दादा क्या हुवा तेरा वादा असे सपकाळ म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याच्या महायुतीच्या सरकारचा समाचार घेतल्यावर त्यांनी मोदी सरकारवरही टीका केली. मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडले असून लघू, छोटे व मध्यम उद्योग देशोधडीला लागले. नोटबंदी व जीएसटी नंतर या व्यवसायाला अवकळा आली.
नोटबंदीमुळे काळा पैसा उघड झाला नसून जेवढ्या नोटा होत्या तेवढा आरबीआय मध्ये जमा झाल्या आहेत. पण नोटबंदीमुळे मध्यम व्यवसाय मोडीत निघाला असून उल्हासनगर मधील उद्योग व्यवसायावर संकट आल्याचे सपकाळे म्हणाले. लोकशाहीमध्ये समता आणि सामाजिक न्यायाची मुल्ये आहेत. मोदी सरकारमध्ये श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरिब अधिक गरिब होत आहेत, गरिब व उपेक्षितांचा विचार झाला पाहिजे, छोट्या लघु उद्योगाला चालना मिळाली पाहिजे असेही सपकाळ म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह माजी खासदार व मंत्री हुसेन दलवाई, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.