तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा
By सुरेश लोखंडे | Updated: July 23, 2023 19:35 IST2023-07-23T19:34:47+5:302023-07-23T19:35:16+5:30
तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडी हुन जास्त झाली आहे.

तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा
ठाणे : बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणार्या तानसा धरणात पावसाचा जाेर कायम आहे. त्यामुळे धरण भरून वाहण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे खबरदारीची उपाययाेजना म्हणून या धरणाखालील व नदीच्या काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडी हुन जास्त झाली आहे. त्यामुळे लवकरच धरण ओसंडून वाहण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने तानसा धरणाखालील व नदीच्या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या धरणातील पाण्याचा विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. याशिवाय महसूल व पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सूचना देण्यात आले आहे.