Video: बदलापुरात भयंकर घडलं! सीएसएमटीकडे जाणारी लोकल पकडताना महिलेचा मृत्यू, वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 16:27 IST2026-01-31T16:25:08+5:302026-01-31T16:27:20+5:30
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघालेली जलद लोकल रेल्वे पकडताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बदलापूर रेल्वे स्थानकावर घडली. चाकाखाली सापडल्याने महिलेचा जागेवरच मृत्यू झाला.

Video: बदलापुरात भयंकर घडलं! सीएसएमटीकडे जाणारी लोकल पकडताना महिलेचा मृत्यू, वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न
- पंकज पाटील, बदलापूर
बदलापूर रेल्वे स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघालेली लोकल पकडताना एका महिलेचा मृत्यू झाला. हाताने दरवाजा पकडला मात्र पाय ठेवता आला नाही आणि महिला खाली पडून लोकलखाली सापडली. चेतना चंद्रशेखर देवरुखकर असे या महिलेचे नाव आहे. सकाळी 8 वाजून 11 मिनिटांची सीएसएमटी लोकल पकडताना ही दुर्दैवी घटना घडली. ही घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
28 वर्षीय चेतना या जुवेली येथील जगन्नाथ गॅलेक्सीमध्ये वास्तव्याला होत्या. वर्षभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे त्या 8.11 मिनिटांची मुंबईकडे जाणारी फास्ट लोकल पकडण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. स्थानकात आल्यानंतर लोकल ट्रेन सुरू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी फ्लॅटफॉर्मवरून निघत असलेली लोकल पकडण्याचा प्रयत्न केला.
महिलेचा लोकल रेल्वेखाली मृत्यू, कशी घडली घटना?
मुंबई दिशेकडील पहिलाच महिला डबा पकडताना त्यांचा अंदाज चुकला आणि त्या लागलीच प्लॅटफॉर्मच्या खाली पडल्या. दुर्दैवाने प्लॅटफॉर्मचा शेवट असल्याने त्या थेट लोकलच्या चाकाखालीच साापडल्या आणि या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पादचारी पुलाच्या समोरच महिला डबा असून तो डबा पकडताना त्या ठिकाणी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी देखील उपस्थित होते. मात्र लोकल ट्रेन सुरू झाल्यावर चेतना यांनी कोणताही विचार न करता थेट लोकल पकडण्याचा प्रयत्न केल्यामुळे या कर्मचाऱ्यांना देखील केवळ बघण्याशिवाय काहीही मार्ग नव्हता.
बदलापूर रेल्वे स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघालेली लोकल पकडताना एका महिलेचा मृत्यू झाला. हाताने दरवाजा पकडला मात्र पाय ठेवता आला नाही आणि महिला खाली पडून लोकलखाली सापडली. सकाळी 8 वाजून 11 मिनिटांची सीएसएमटी लोकल पकडताना ही दुर्दैवी घटना घडली. ही घटना रेल्वे… pic.twitter.com/x4thgO4k0z
— Lokmat (@lokmat) January 31, 2026
प्रवाशांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण उशीर झाला
अपघात घडल्यानंतर त्याची कल्पना प्रवाशांना आल्यावर त्यांनी लागलीच लोकल गाडी थांबवत तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला असून केवळ चेतना याच नव्हे तर अनेक महिला देखील लोकल सुरू होण्याआधी धावत पळत ही लोकल पकडत होते. त्यामुळे सकाळच्या वेळेस महिलांच्या डब्यात लोकल पकडण्यासाठी होणारी कसरत पुन्हा एकदा समोर आली आहे.
सकाळी 8.11 मिनिटांनी सुटणारी लोकल पकडता न आल्यास नंतर तब्बल 40 मिनिटानंतर बदलापूरहुन सुटणारी लोकल आहे. त्यामुळे 8.11 ची ही लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू असते.