ओडिसातील गांजाची ठाण्यात तस्करी करणा-या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 21:26 IST2018-03-04T21:26:46+5:302018-03-04T21:26:46+5:30
ओडिसाचा गांजा रेल्वेने ठाण्यात विक्रीसाठी आणणा-या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी अटक केली. दोन हजार रुपये प्रति किलोचा गांजा ठाण्यात ते १३ हजारांमध्ये विक्री करीत होते.

ठाण्याच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
ठाणे : ओडिसातून विशाखापट्टणममार्गे ठाणे आणि कल्याण परिसरांत गांजाची तस्करी करण्यासाठी आलेल्या व्हिक्टर जोसेफ (४७) आणि बल्ला विराबदरराव (३२, रा. दोघेही विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश) यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून साडेसहा किलोच्या गांजासह एक लाख एक हजारांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील रेल्वेस्थानक परिसरात काही व्यक्ती अमली पदार्थ विक्र ी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस नाईक दिलीप सोनवणे यांना मिळाली होती. त्यानुसार, ३ मार्चला पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास रेल्वेस्थानक परिसरातील ओम साई बेल्ट या दुकानाच्या समोरून व्हिक्टर आणि बल्ला या दोघा संशयितांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे, उपनिरीक्षक धर्मराज बांगर, पोलीस नाईक दिलीप सोनवणे, अमोल पवार, नामदेव मुंढे आदींच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत सॅकमध्ये लपवलेला ९७ हजार ५०० रुपयांचा साडेसहा किलो गांजा, ५०० रुपये रोख, तीन हजारांचा मोबाइल, व्हिक्टर याच्या नावाने असलेल्या आंध्र प्रदेश राज्याच्या वाहन परवान्याची छायांकित प्रत तसेच विशाखापट्टणम ते लोकमान्य टिळक टर्मिनसचे १ मार्चचे अनारक्षित तिकीट असा ऐवज हस्तगत करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ३ मार्चला सकाळी १० च्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. ठाणे न्यायालयाने त्यांना १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.