स्फोटाने इमारतींना हादरे; काळजाचा ठोका चुकतोय
By सचिन सागरे | Updated: March 2, 2026 04:36 IST2026-03-02T04:35:55+5:302026-03-02T04:36:19+5:30
- सचिन सागरे लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : अमेरिका - इराण युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. इराणने ...

स्फोटाने इमारतींना हादरे; काळजाचा ठोका चुकतोय
- सचिन सागरे
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : अमेरिका - इराणयुद्धामुळे आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. इराणने इस्रायलसह शेजारच्या ८ देशांतील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले. त्यामुळे तेथील नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातून आखाती देशांमध्ये नोकरीसाठी गेलेल्या नागरिकांबाबत त्यांच्या नातेवाइकांनी चिंता व्यक्त केली. हल्ल्यांमुळे अक्षरश: स्फोट झाल्यासारखे मोठे आवाज येत असून, प्रत्येक आवाजासोबत इमारतीला हादरे बसत असून, काळजाचा ठोका चुकतोय, असे थरारक अनुभव युएईत काम करणाऱ्यांनी नातेवाइकांना सांगितले.
कल्याणमधील काही नागरिक संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) आहेत. अबुधाबीतील अमदान स्ट्रीट येथे राहणाऱ्या नागरिकांना शनिवारी रात्री दोनदा व रविवारी दुपारी घरापासून चार किलोमीटर अंतरावर स्फोटासारखा मोठा आवाज ऐकू झाला. त्याचे हादरे इमारतींना बसल्याचा अनुभव तेथे नोकरीसाठी गेलेल्या कल्याणमधील एका नागरिकाने ‘लोकमत’कडे कथन केला. कल्याणमधील काही काटुंबीयांचे नातेवाइक अबुधाबीत राहतात. मात्र, दोन्ही कुटुंबांनी त्यांचे नाव प्रसिद्ध न करण्याची विनंती केली. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात नातेवाइकांनी कल्याणला येण्यासाठी विमान तिकीट काढले होते. मात्र, आता उड्डाणेच बंद आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने मोबाइल सतत चार्ज ठेवावा लागतो.
सौदी अरेबियातील दम्माम येथे सुमारे २५ टक्के लोकसंख्या भारतीयांची असून, त्यात कोकण व केरळमधील नागरिकांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती तेथे नोकरीनिमित्त गेलेल्या कल्याणच्या एका युवकाने दिली.
शस्त्रांचे अवशेष जमिनीवर
विमान किंवा शस्त्राचे काही अवशेष जमिनीवर पडल्याने आग लागल्याच्या घटना घडत आहेत.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे, असे शारजाह येथे राहणाऱ्या कल्याणच्या एका महिलेने ‘लोकमत’ला सांगितले.
कुणी अडकल्याची माहिती नाही
ठाण्यातील कुणीही आखाती देशात अडकल्याचा अहवाल नाही. कल्याण व शहापुरातील २५, तर भिवंडी १० व अन्य काही परिसरातील नागरिक आखाती देशांत रोजगारासाठी गेलेले आहेत. मात्र, ते अडकल्याची जिल्हा प्रशासनाकडे नोंद झालेली नाही, असे ठाणे जिल्हा प्रशासनाने सांगितले.