जास्त प्रवासी कोंबणाऱ्या टॅक्सीचालकांना दणका! अकरा बळी गेल्यानंतर वाहतूक पोलिसांना जाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 09:40 IST2026-04-16T09:38:09+5:302026-04-16T09:40:51+5:30
कल्याण - कल्याण -मुरबाड रस्त्यावर रायते पुलावर दोन दिवसांपूर्वी सहा आसनी इको टॅक्सीचा अपघात होऊन ११ जणांचा मृत्यू झाला. ...

जास्त प्रवासी कोंबणाऱ्या टॅक्सीचालकांना दणका! अकरा बळी गेल्यानंतर वाहतूक पोलिसांना जाग
कल्याण - कल्याण-मुरबाड रस्त्यावर रायते पुलावर दोन दिवसांपूर्वी सहा आसनी इको टॅक्सीचा अपघात होऊन ११ जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ‘लोकमत’ने बेकायदा प्रवासी वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आणला. त्याची दखल घेत बेकायदा प्रवासी वाहतुकीच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी बुधवारी दंडात्मक कारवाई सुरू केली.
कारवाईत सातत्य राहिले तरच बेकायदा प्रवासी वाहतुकीला चाप बसू शकतो हे लक्षात घेऊन अपघातानंतर कल्याण-मुरबाड मार्गावरील इको टॅक्सी सेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरातून इको टॅक्सी चालक प्रवासी भाडे भरताना दिसून आले. सहापेक्षा जास्त प्रवासी असलेल्या टॅक्सींवर दंडात्मक कारवाई केली. कल्याण-भिवंडी मार्गावरील टॅक्सी वाहतूक सुरू आहे. तेथे सहापेक्षा जास्त प्रवासी टॅक्सीत कोंबले जातात.
संघटनांकडून पाठराखण ?
सहा आसनी इको टॅक्सी चालकांच्या विरोधात कारवाई केल्यास संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा फाेन पोलिस आणि आरटीओ अधिकाऱ्यांना येतो.चालक मालकांच्या संघटना रिपब्लिकन पार्टी, उद्धवसेना, भाजप, आदी पक्षांच्या प्रणीत आहेत.
आरटीओची कारवाई
कल्याण-मुरबाड रस्त्यावर टॅक्सींची वाहूतक कमी झाल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकूल यांनी एसटी डेपोच्या व्यवस्थापकांची भेट घेतली. मुरबाड मार्गावर अधिक बस सोडव्यात, अशी सूचना त्यांनी केली. आरटीओच्या पथकाने कल्याण-मुरबाड मार्गावरील सहा वाहनांच्या विरोधात कारवाई केल्याची माहिती बारकूल यांनी दिली.
अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा आरोप, आंदोलनाचा पवित्रा
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहनांमध्ये काेंबले जातात. अधिकारी हप्ते घेत असल्याने नियमभंग करणाऱ्या वाहनांवर ठोस कारवाई होत नाही. बेकायदा प्रवासी वाहतुकीच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी (शरद पवार)चे प्रदेश सरचिटणीस वल्ली राजन यांनी दिला आहे. त्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.