'लॉकडाऊन'ची अफवा पसरवणं पडलं महागात; मुंब्र्यातील 'त्या' तरुणाला पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 11:26 IST2026-03-27T11:25:22+5:302026-03-27T11:26:21+5:30
ठाण्यातील मुंब्रा परिसरात एका तरुणाला लॉकडाऊनची खोटी अफवा पसरवणे चांगलेच महागात पडले आहे.

AI Generated Image
सोशल मीडियाचा अतिवापर आणि प्रसिद्धीची हाव कधी अंगलट येईल, याचा नेम नाही. ठाण्यातील मुंब्रा परिसरात एका तरुणाला लॉकडाऊनची खोटी अफवा पसरवणे चांगलेच महागात पडले आहे. "आज रात्री १२ वाजेपासून परिसरात कडक लॉकडाऊन लागू होणार आहे," असा दावा करणारा व्हिडिओ या तरुणाने व्हायरल केला होता. यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर मुंब्रा पोलिसांनी तत्परता दाखवत या अफवाखोर तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.
अफवेमुळे नागरिकांची उडाली तारांबळ
संबंधित तरुणाने आपल्या मोबाईलवरून एक व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. यामध्ये त्याने प्रशासनाने अचानक लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याचा खोटा दावा केला होता. हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आणि मुंब्र्यात एकच खळबळ उडाली. अधिकृत घोषणा नसतानाही लोक घाबरले आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडू लागले. अनेकांनी एकमेकांना फोन करून चौकशी सुरू केल्याने अफवेचा जोर अधिकच वाढला.
पोलिसांची ॲक्शन मोडमध्ये एन्ट्री
घटनेचे गांभीर्य ओळखून मुंब्रा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. सायबर सेलच्या मदतीने व्हिडिओची पडताळणी करून पोलिसांनी आरोपी तरुणाचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, कोणत्याही खातरजमेविना केवळ खोडसाळपणा म्हणून हा व्हिडिओ बनवल्याची कबुली त्याने दिली.
भररस्त्यात मागितली जाहीर माफी
पोलिसांनी केवळ कारवाई करून न थांबता, या तरुणाकडून त्याने केलेल्या चुकीबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागवून घेतली. "भविष्यात अशी चूक पुन्हा करणार नाही," अशी तंबीही त्याला देण्यात आली आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवून शांतता भंग करणाऱ्यांना हा एक मोठा इशारा मानला जात आहे.
पोलिसांचे आवाहन: खातरजमेविना मेसेज फॉरवर्ड करू नका!
मुंब्रा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत सूत्रांकडून त्याची पुष्टी करून घ्यावी. विशेषतः सोशल मीडियावरील माहितीची शहानिशा केल्याशिवाय ती पुढे पाठवू नका. अफवा पसरवणे हा गुन्हा असून, अशा प्रकारच्या कृत्यांमुळे समाजात अनावश्यक भीती आणि गोंधळ निर्माण होतो.