राजकीय वैमनस्यातून ठाण्यात दोघांवर चाकू हल्ला, शिवसेना भाजपा कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 22:46 IST2017-09-25T22:46:08+5:302017-09-25T22:46:28+5:30

पूर्व राजकीय वैमनस्यातून सोनू पाल आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांनी वागळे इस्टेट विभागाचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर मेटकरी आणि धनंजय कावळे यांच्यावर चाकू, बांबू आणि दगडाने हल्ला केल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

 Political fanatics threw a knife in both of Thane and Shivsena BJP workers | राजकीय वैमनस्यातून ठाण्यात दोघांवर चाकू हल्ला, शिवसेना भाजपा कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री  

राजकीय वैमनस्यातून ठाण्यात दोघांवर चाकू हल्ला, शिवसेना भाजपा कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री  

ठाणे, दि. २५ - पूर्व राजकीय वैमनस्यातून सोनू पाल आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांनी वागळे इस्टेट विभागाचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर मेटकरी आणि धनंजय कावळे यांच्यावर चाकू, बांबू आणि दगडाने हल्ला केल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या हल्ल्याचे शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे हे सूत्रधार असल्याचा आरोप करीत त्यांच्या अटकेची मागणी भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (२४ सप्टेंबर) रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास रघुनाथनगर येथील कशिश पार्क सोसायटीतील सागर मेटकरी आणि धनंजय कावळे या दोघांना सोनू पाल आणि त्याच्या साथीदारांनी जबर मारहाण केली. त्यानंतर बांबू, दगड आणि चाकूनेही त्यांच्यावर हल्ला केला. यात मेटकरीच्या हातावर चाकूचा वार झाला असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
यासंदर्भात भाजप युवा मोर्चा ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश आंग्रे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांची सोमवारी दुपारी भेट घेतली. याप्रकरणी रेपाळे हे सूत्रधार असून त्यांनाही अटक झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी या कार्यकर्त्यांनी यावेळी केली. यासाठी त्यांनी मालेकर यांना काही काळ घेरावही घातला होता. मात्र, रेपाळे यांचे नाव एफआयआरमध्ये नसल्याचे मालेकर यांनी या कार्यकर्त्यांना सांगितले. परंतु, यात कोणीही दोषी आढळले तरी संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन मालेकर यांनी या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना दिले.
अशी आहे पार्श्वभूमी...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कशिश पार्क येथील स्थानिक नगरसेविका नम्रता भोसले, रुपाली रेपाळे आणि विकास रेपाळे यांनी २३ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास सुजाता कोळमकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या सुनेला आणि पतीला शिवीगाळ आणि दमदाटी केली होती. यात त्यांच्या कुटुंबीयांना धक्काबुक्की केल्याचाही आरोप आहे. त्यावेळी विकास रेपाळेंनी या मंडळातील कार्यकर्त्यांना दमबाजीही केली होती. याच संदर्भात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात नम्रता भोसले, रुपाली रेपाळे यांच्याविरुद्ध कोळमकर कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. हाच राग मनात धरुन २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान कशिश पार्कच्या गेटवर एका टोळक्याने येणाºया जाणाºयांच्या नावांची विचारपूस केली. त्याचदरम्यान सागर आणि धनंजय हे दोघे सोसायटीच्या बाहेर पडले, त्यावेळी त्यांच्यावर सोनू पाल आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांनी हा खूनी हल्ला केल्याचा आरोप आहे. 

कशिश पार्कमधील सागर मेटकरीवर हल्ला केल्याच्या बातम्या पेरण्यात येत आहेत. या घटनेशी आपला दुरान्वयेही संबंध नाही. आपण त्यावेळी अंधेरी येथे होतो. दाखल गुन्हयात कुठेही आपल्या नावाचा उल्लेख नाही. उलटपक्षी सागर मेटकरी आणि प्रशांत जाधव हेच गेली अनेक महिने आपल्याविरुद्ध बातम्या पेरत आहेत. शिवाय, सागरने स्वत:च वार करुन घेतल्याची आपली माहिती आहे.
-विकास रेपाळे, नगरसेवक, शिवसेना
 

Web Title:  Political fanatics threw a knife in both of Thane and Shivsena BJP workers