"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 14:06 IST2025-06-09T14:04:58+5:302025-06-09T14:06:41+5:30
Kirit Somaiya on Mumbai Train Accident: "लोकसंख्या वाढली, त्या गतीने वाहतूक व्यवस्था वाढवू शकलो नाही"

"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
Kirit Somaiya on Mumbai Train Accident: आठवड्याचा पहिलाच दिवस मुंबई ठाण्यातील चाकरमान्यांसाठी घातवार ठरला. मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. फास्ट लोकल एकमेकांच्या शेजारून जात असतानाच हा भीषण अपघात घडला. मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान सीएसएमटी लोकल आणि कसारा लोकल एकमेकांना ओलांडत होत्या. त्यावेळी ही घटना घडली. रेल्वे प्रशासनाकडून तातडीने रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आणि जखमींना कळवा रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. घडलेल्या घटनेवर भाजपा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करत मत व्यक्त केले.
सोमय्या यांचे ट्विट:
"मुंब्रा कळवा येथील घटना दुर्दैवी आहे. ठाणे ते डोंबिवली परिसरातील लोकसंख्या ज्या गतीने वाढली, त्या गतीने आपण वाहतूक व्यवस्था वाढवू शकलो नाही. म्हणूनच देवेंद्र फडणवीस सरकारने मेट्रोच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पर्यायी रस्त्यांची क्षमता वाढवणे आणि त्याचबरोबर ठाणे बायपास करून दिवाला डायरेक्ट रेल्वे कनेक्शन, सगळे डब्बे १५ डब्याचे करून, क्षमता वाढण्याचा प्रयत्न सुरू आहे. याला २ ते ५ वर्ष लागणार. अशा वेळेला प्रवाश्यांनी ही शिस्त पाळावी एवढीच विनंती," अशा शब्दांत सोमय्या यांनी भावना व्यक्त केल्या.
"मुंब्रा कळवा येथील घटना दुर्दैवी आहे"
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 9, 2025
ठाणे ते डोंबिवली परिसरातील लोकसंख्या ज्या गतीने वाढली त्या गतीने आपण वाहतूक व्यवस्था वाढवू शकलो नाही.
म्हणूनच देवेंद्र फडणवीस सरकारने मेट्रोच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
पर्यायी रस्त्यांची क्षमता वाढवणे आणि त्याच बरोबर ठाणे…
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
"दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण ८ प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे," अशी माहिती फडणवीसांनी दिली.
दरम्यान, या अपघातात बरेच लोक जखमी झाले आहेत आणि पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.