लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जे. जे. कला महाविद्यालयात शिकत असताना मी डोंबिवलीत चार मजले चढून ‘लोकमत’सह वेगवेगळे पेपर वाटायचो. आज ‘लोकमत’च्या व्यासपीठावर माझी मुलाखत होत आहे, हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. पेपर टाकण्याच्या कामातून मला महिन्याला ३०० रुपये मिळायचे. त्यातून डोंबिवली ते मुंबईचा पास आणि कॉलेजची फी भरण्याइतके पैसे मिळायचे. वर्तमानपत्राचे महत्त्व माझ्या आयुष्यात मोठे आहे. मी पेपर टाकून शिकलो. आज एक यशस्वी चित्रपट दिग्दर्शक आहे, याचा मला अभिमान आहे... ही गोष्ट उलगडून दाखवली प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव यांनी.
निमित्त होते ‘लोकमत मॅजेस्टिक गप्पा’च्या कर्टन रेझर कार्यक्रमाचे. ‘नटरंग’पासूनच्या चित्रपटांचा थक्क करणारा प्रवास रवी जाधव सांगत होते. ठाणेकर रसिक हा प्रवास तितक्याच उत्सुकतेने ऐकत होते. मराठी भाषा, मराठी माणसाच्या यशाच्या गोष्टींनी शनिवारची संध्याकाळ भारून गेली. जाधव यांच्याशी संवेदनशील दिग्दर्शक विजू माने यांनी संवाद साधला. ‘लोकमत साहित्य महोत्सवा’अंतर्गत कोरम मॉल येथे रंगलेल्या गप्पा संपूच नये, अशी प्रत्येक रसिकाची भावना होती. मॉलमध्ये फिरण्यासाठी आलेल्या माणसांचे पायही मुलाखत सुरू असलेल्या ठिकाणीच थांबले. सर्व खुर्च्या भरल्याने उभे राहून लोक ऐकत होते.
पेपर टाक्या मुलगा, दगडू आणि चांगल्या घरची शिकलेली मुलगी हे टाइमपास सिनेमातील पात्र माझ्यावरून घेतल्याचे जाधव यांनी सांगितले. विशेष म्हणजे विजू माने यांनीही पेपर टाकण्याचे काम केलेले आहे. मी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये संगीत महत्त्वाचा घटक आहे. कारण डोंबिवली ते मुंबई आणि परतीचा लोकल प्रवास मी फक्त गाणी आणि संगीत ऐकायचो. जगभरातील संगीत मी ऐकले. त्याचा उपयोग मला जाहिरात क्षेत्रात, जिंगल्स करताना झाला आणि तोच उपयोग सिनेमा करताना झाला. संगीत माझ्या सिनेमातील पटकथेचा भाग असतो, असेही त्यांनी सांगितले.
जाधव यांनी ‘नटरंग’च्या निर्मितीची माहिती दिली. एकीकडे जाहिरात क्षेत्रात चांगली नोकरी होती. महिन्याचे काही लाखांचे पॅकेज सुरू होते. सर्व सुखसोयी होत्या आणि दुसरीकडे नोकरी सोडून सिनेमा करायचा निर्णय. हे मोठे आव्हान होते. नोकरी सोडली तेव्हा मी शून्यावर आलो. उत्तम सिनेमा करणे हे माझे पॅशन होते. २००५ ला ‘नटरंग’ करायला घेतला आणि तो २००९ ला आला.
आयुष्यात कधी रिजेक्शन आले का? या माने यांच्या प्रश्नावर जाधव म्हणाले की, रिजेक्शन आयुष्यात खूपदा आले. राजा शिवाजी चित्रपटासाठी मला रिजेक्ट केले नाही; पण वर्ष २०१६ मध्ये मुलाची तब्येत बिघडल्यामुळे त्यातच चार वर्षे गेली. ‘बालगंधर्व’चा प्रवास कठीण होता. कोणत्याही मराठी दिग्दर्शकाला सतत सिद्ध करावे लागते. हा मी दिग्दर्शित केलेला सिनेमा आहे, हे छातीठोकपणे सांगावे लागते. हिंदी दिग्दर्शकाला लोक डोक्यावर घेतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ‘नटरंग’सारखा तमाशापट आणि ‘बालगंधर्व’सारखा नाट्यसंगीतावर चित्रपट आला नाही. हिंदीत केलेल्या ‘बँजो’, ‘मैं अटल हूँ’ या चित्रपटांची निर्मिती आणि यशापयशाची गोष्ट त्यांनी सांगितली. आगामी ‘फुलवारा’ चित्रपटात १६ गाणी असल्याचे सांगितले.
उपस्थित रसिकांनीही यावेळी प्रश्न विचारले. त्याला जाधव व माने यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. ‘लोकमत’चे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. विजय शुक्ला यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
रवी जाधव एकीकडे, मराठी इंडस्ट्री दुसरीकडे
रवी जाधव यांच्या २००९ ते २०१५ पर्यंतच्या सिनेमांची उलाढाल ही या काळातील मराठी फिल्म इंडस्ट्रीतील इतर सिनेमांच्या उलाढालीपेक्षा जास्त असल्याचा उल्लेख माने यांनी आवर्जून केला.
तमाशाचा फक्त डान्सबार करायचा बाकी आहे
आता तमाशाची अवस्था बिकट झाली आहे. मी नटरंग केला; मात्र आता तमाशाचा फक्त डान्सबार करायचा बाकी आहे. तमाशाच्या नावाखाली ज्या प्रकारे डान्स केले जातात ते योग्य नाहीत. तमाशाच्या नावाखाली काय चालले आहे, तेच कळत नाही, अशीही खंत जाधव यांनी व्यक्त केली.
साहित्य महोत्सवाचे कौतुक
विजू माने यांचा आगामी ‘मामाच्या गोव्याला जाऊ या’ सिनेमा लवकरच येत आहे. त्याच्या निर्मितीची कथा त्यांनी सांगितली. कोरम मॉलमध्ये कविवर्य नारायण सुर्वे ग्रंथदालनात वाचक येऊन पुस्तके चाळत आहेत, याबद्दल ‘लोकमत’चे कौतुक आहे. इव्हेंट खूप होत असतात; पण ‘लोकमत’ने साहित्य महोत्सव आयोजित केला, त्याबद्दल अभिनंदन, अशी भावना व्यक्त केली.
Web Summary : Ravi Jadhav shared his journey from delivering Lokmat to being a film director at 'Lokmat Majestic Gappa'. He emphasized the importance of newspapers and music in his life, recalling challenges and successes. He praised Lokmat's literary festival.
Web Summary : रवि जाधव ने 'लोकमत मैजेस्टिक गप्पा' में लोकमत बांटने से फिल्म निर्देशक बनने तक की यात्रा साझा की। उन्होंने अपने जीवन में समाचार पत्रों और संगीत के महत्व पर जोर दिया, चुनौतियों और सफलताओं को याद किया। उन्होंने लोकमत के साहित्यिक उत्सव की सराहना की।