उल्हासनगरच्या शहाड आणि वालधूनी पुलांना समांतर पूल बांधा, मनसेचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे साकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 18:03 IST2025-12-07T18:02:22+5:302025-12-07T18:03:19+5:30
दोन्ही पुल जुने असून त्याची पुनरबांधणी करण्याची मागणी होत आहे.

उल्हासनगरच्या शहाड आणि वालधूनी पुलांना समांतर पूल बांधा, मनसेचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे साकडे
उल्हासनगरला जोडणारा शहाड व वालधूनी पुलाला समांतर रस्ता बांधण्याची मागणी मनसेने केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली. दोन्ही पुल जुने असून त्याची पुनरबांधणी करण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगर व कल्याण शहराला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक व राज्य महामार्गवरील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन मनसेचे जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे शहाड आणि वालधूनी उड्डाणपूल या दोन्ही ठिकाणी तातडीने समांतर पूल बांधण्याची मागणी केली. शहाड उड्डाणपुलाची निर्मिती सुमारे ३८ वर्षांपूर्वी म्हणजेच १९८७ मध्ये झाली होती. मात्र कल्याण व उल्हासनगरची वाढती लोकसंख्या आजूबाजूच्या ग्रामीण भागाचे शहरीकरण आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे या पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
या दोन्ही महामार्ग टिटवाळा गणपती मंदिर, ओझर, लेण्यांद्री अष्टविनायक, भीमाशंकर आणि माळशेज घाट यांसारख्या महत्त्वाच्या पर्यटन क्षेत्रांकडे जातो. तसेच उल्हासनगर, कल्याण आणि मुरबाड येथील एमआयडीसीमुळे हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र बनले आहे. शहाड व वालधुनी पुलाच्या या समांतर पुलाच्या कामासाठी मुख अभियंता नवी दिल्ली यांच्याकडे १ ऑक्टोबर २०२४ रोजी १०८ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मनसेचे जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख यांनी नितीन गडकरी यांना विनंती केली आहे की, या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी दिल्यास या पुलावरील वाहतूक कोंडीतून विद्यार्थी, नागरिक आणि रुग्णवाहिकांना मोठा दिलासा मिळेल. यावेळी बंडू देशमुख यांच्यासह मनविसेचे जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव, मनविसेचे शहर सचिव तन्मेश देशमुख आणि विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गरड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.