'ठाण्यात भाजपचे ९ आमदार, जवळपासही कुणी नाही; वेळ पडेल तेव्हा...', भाजप आमदार केळकरांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 13:18 IST2025-04-07T13:12:58+5:302025-04-07T13:18:02+5:30
Sanjay Kelkar News: भाजपचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी केलेल्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे. केळकर यांनी ठाणे हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचा दावा केला आहे.

'ठाण्यात भाजपचे ९ आमदार, जवळपासही कुणी नाही; वेळ पडेल तेव्हा...', भाजप आमदार केळकरांचं विधान
Thane News: सर्वच राजकीय पक्ष आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यातील राजकीय पक्षांच्या प्रमुखांकडून स्थानिक नेत्यांना निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. अशातच ठाणे शहरचे आमदार संजय केळकर यांनी एक मोठं विधान केलं आहे. ठाणे जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. भाजपच्या जवळपासही कुणी नाही, असे आमदार केळकर म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शिंदेंची शिवसेना आणि भाजप महायुतीतील मित्रपक्ष असले तरी शिंदेंचं बलस्थान असलेल्या ठाण्यात भाजपकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. मंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारच्या माध्यमातून पक्ष वाढवण्याचे काम हाती घेतल्याचे दिसत आहे. त्यातच आता आमदार संजय केळकर यांनी ठाणे हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचा दावा केला.
आमदार संजय केळकर यांचे विधान काय?
माध्यमांशी बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, 'भाजपचे ठाणे जिल्ह्यात ९ आमदार आहेत. ९ आमदारांच्या जवळपासही कुणी नाहीये. त्यामुळे ठाणे जिल्हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे महापालिकांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात लोक निवडून आणणं आणि लोकांचं समर्थन मिळतं आहे. सामान्य माणसाचा भाजपवर विश्वास आहे. त्यामुळे हा पक्ष वाढत जाईल. वेळ पडेल तेव्हा स्वतंत्र, वेळ पडेल तेव्हा सर्वांना बरोबर घेऊन. पण, भाजप आता थांबणार नाही', असे विधान आमदार संजय केळकर यांनी केले.
महापालिका निवडणुकीची तयारी
राज्यात बहुतांश महापालिकांवर प्रशासक असून, स्थानिक पदाधिकाऱ्यांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. पुढील काही महिन्यांत महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होण्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठीही भाजपने तयारी सुरू केली आहे.
वाचा >>ठाणे पालिका कर्जाच्या विळख्यात सापडणार
ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका आहेत. यात ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका, भिवंडी निजामपूर महापालिका, मीरा-भाईंदर महापालिका, उल्हासनगर महापालिका यांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीला चांगले यश मिळाले. पण, महापालिका निवडणुकीत महायुतीत लढणार की, स्वतंत्र हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.