ओरॅकलमधील १२००० जणांच्या नोकऱ्या गेल्या, बेंगळुरूला मोठा हादरा बसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 12:29 IST2026-04-02T12:27:48+5:302026-04-02T12:29:33+5:30
Oracle Layoffs India 2026: Oracle मधील महाछंटणीमुळे बेंगळुरूच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये मंदीचे संकेत. आयटी प्रोफेशनल्स आता घर खरेदीपासून दूर का पळत आहेत? जाणून घ्या यामागचं नेमकं कारण.

ओरॅकलमधील १२००० जणांच्या नोकऱ्या गेल्या, बेंगळुरूला मोठा हादरा बसला
दिग्गज अमेरिकन आयटी कंपनी ओरॅकल मधील मोठ्या प्रमाणावरील छंटणीचे लोण आता बेंगळुरूच्या प्रॉपर्टी मार्केटपर्यंत पोहोचले आहे. आयटी कर्मचाऱ्यांच्या भरमसाठ पगारावर अवलंबून असलेल्या या मार्केटमध्ये आता मंदीचे सावट स्पष्टपणे दिसू लागणार आहे. ओरॅकलने भारतातून सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला असून, पुढील महिन्यात कपातीची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने रिअल इस्टेट क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.
२०२१ ते २०२३ या काळात बेंगळुरूच्या घरांच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. मात्र, आयटी क्षेत्रातील या अनिश्चिततेमुळे आता मागणीत घट झाली आहे. ज्या भागात आयटी प्रोफेशनल्सची मोठी वर्दळ असायची, तिथल्या नवीन प्रकल्पांची गती मंदावली आहे. 'टेक हब' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात घरांच्या विक्रीवर थेट परिणाम झाला असून खरेदीदार आता मोठ्या गुंतवणुकीपासून मागे हटत आहेत. अशातच ओरॅकलचा दुसरा सर्वात मोठा कॅम्पस असलेल्या या शहरात कंपनीने एका झटक्यात १२ हजार लोकांना काढून टाकल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
EMI च्या जाळ्यात अडकण्याची भीती
आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांच्या असुरक्षिततेमुळे अनेक कर्मचारी घर खरेदीचा निर्णय लांबणीवर टाकत आहेत. सोशल मीडियावर एका नोकरी गेलेल्या तरुणाची पोस्ट सध्या चर्चेत आहे, त्याने लिहिले की, "बरं झालं मी घर खरेदी केलं नाही, नाहीतर आज EMI च्या जाळ्यात अडकून आयुष्य अधिक कठीण झालं असतं." हीच भावना सध्या बेंगळुरूमधील हजारो आयटी कर्मचाऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे.
पुणे, हैदराबादमध्येही चिंतेचे वातावरण
केवळ बेंगळुरूच नाही, तर पुणे, हैदराबाद आणि दिल्ली-एनसीआर सारख्या शहरांच्या रिअल इस्टेट मार्केटवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आयटी क्षेत्रातील पगारवाढ आणि नवीन भरतीवर या शहरांचे गृहनिर्माण क्षेत्र अवलंबून असते. ओरॅकलने जागतिक स्तरावर आतापर्यंत ३०,००० कर्मचारी कमी केले आहेत, ज्यामुळे तांत्रिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक असुरक्षितता वाढली आहे.