मित्राच्या कर्जासाठी जामीनदार, हप्ते न भरल्याने फायनान्स कंपनीचा तगादा; तरुणाचा भयानक शेवट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:48 IST2025-06-05T14:46:24+5:302025-06-05T14:48:07+5:30
सोलापुरात फायनान्स कंपनीच्या तगाद्याला कंटाळून तरुणाने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.

मित्राच्या कर्जासाठी जामीनदार, हप्ते न भरल्याने फायनान्स कंपनीचा तगादा; तरुणाचा भयानक शेवट
Solpaur Crime: फायनान्स कंपनीकडून सातत्याने पैशासाठी होत असलेल्या तगाद्याला कंटाळून एका ३९ वर्षीय तरुणाने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.
नागेश सुरेश अंटद (वय ३९, रा. घर नंबर ८३३, शरणमठ, राठी कारखाना, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवार, ३ जून रोजी मध्यरात्री साडेदहा वाजेच्या सुमारास रेल्वे डाऊन लाइन किलोमीटर ४५७/२५ च्या जवळ हात कट झालेल्या स्थितीत एक तरुण पडलेला असल्याचे पोलिसांना कळविण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडून माहिती प्राप्त होताच सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रेल्वे रुळावर बेशुद्धावस्थेत पडलेल्या तरुणास उपचारासाठी पोलिस हेडकॉन्स्टेबल आर. एन. मनोहर यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ. धुव्र गायकवाड यांनी सांगितले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अंटद कुटुंबातील नातेवाइकांनी शासकीय रुग्णालयात गुरुवारी सकाळी धाव घेतली. दुपारी दोननंतर शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी उशिरा नागेश अंटद यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नागेश हा टोपी शिवणकाम करण्याचा व्यवसाय करीत होता. त्याची घरची परिस्थिती सर्वसाधारण होती असे सांगण्यात आले. या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलिस वेगाने करीत आहेत.
नागेश मित्राच्या कर्जप्रकरणासाठी जामीनदार झाले होते. मित्राने कर्जाचे हप्ते भरले नाहीत, त्यामुळे फायनान्स कंपनीकडून पैशांसाठी नागेश याच्यांकडे सातत्याने तगादा लावला जात होता. याच त्रासाला ते कंटाळले होते, मानसिक संतुलन बिघडले होते, त्यातूनच त्यांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता नातेवाइकांनी व्यक्त केली आहे.