शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले ते आधी सांगावे; अमित शहांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 22:34 IST2019-09-01T20:48:13+5:302019-09-01T22:34:26+5:30

अमित शहा यांनी शरद पवार यांचे नाव घेत अजित पवारांवर जोरदार टीका केली.

Sharad Pawar Let us first explain what you did for Maharashtra; Amit Shah's challenge | शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले ते आधी सांगावे; अमित शहांचा घणाघात

शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले ते आधी सांगावे; अमित शहांचा घणाघात

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची आज सांगता झाली. यावेळी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर शरसंधान साधले. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपा सरकारच्या कामांची माहिती दिली. तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. 


आज राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी अमित शहा यांनी शरद पवार यांचे नाव घेत अजित पवारांवर जोरदार टीका केली. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीची खिल्ली उडविली. जर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बैठकीचा दरवाजा उघडला तर आता केवळ पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारच दिसतील. कारण बाकीचे आमच्या बाजुला आले आहेत, अशी टीका केली. 


शरद पवार यांचे लाडके अजित पवार यांनी 74 हजार कोटीचा सिंचन घोटाळा केला. हजारो कोटींचा निधी दिला पण एक थेंब पाणी मिळाले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने केलेल्या भ्रष्टाचारामुळेच महाराष्ट्र मागे पडला. मात्र देवेंद्र फडणीस यांनी मागील पाच वर्षात विकास कामे करून महाराष्ट्र नंबर वन बनवला. हा काळ सुवर्णाक्षरांत लिहिला जाईल. काँग्रेस मधील गांधी घराणे हे राजकारणाला घरचा ठेका समजतात, अशी टीका अमित शहा यांनी केली. 


शरद पवार यांची वक्तव्ये वाचली. पवार तुम्ही सत्तेत होता त्यावेळेस महाराष्ट्राला काय दिले हे अगोदर सांगा, असे आव्हानही शहा यांनी पवार यांना दिले. तसेच हा प्रश्न पवारांना सोलापूर दौऱ्यावेळी विचारण्याचे आवाहन सोलापूरकारांना केले. 

पाकिस्तानच्या सर्व स्वप्नांवर पाणी फेकण्याचे काम मोदींनी केले. राहुल गांधी आणि शरद पवार यांनी 370 हटवले याबद्दल आपली भुमिका स्पष्ट करावी. भाजपाने ज्या - ज्या वेळी विरोधक म्हणून काम केले त्यावेळी देशाचे प्रश्न आले त्यावेळेस भाजपने काँग्रेस सरकारला समर्थन दिले. पुन्हा एकदा देवेंद्र फडणीस यांना मुख्यमंत्री बनणार का, असा सवालही शहा यांनी कार्यकर्त्यांना केला.

ईव्हीएमवरून शरसंघान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्ये विरोधकांच्या ईव्हीएमवरील टीकेवरून शरसंधान साधले. सत्तेची मुजोरी होती म्हणूनच काँग्रेस-राष्ट्रवादीला जनतेने नाकारले. बारामतीत सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगलं, तर सोलापुरात जय सिद्धेश्वर महास्वामी निवडून आले तर ईव्हीएम वाईट असे कसं, असा सवालही उपस्थित करत परिक्षेला नापास झालेल्या मुलाचे उदाहरण दिले. 2004 ते 2014 च्या निवडणुका ईव्हीवर झाल्या. तेव्हा ईव्हीएम खराब नव्हते का, मोदी जिंकल्यावरच ईव्हीएम खराब झाल्याची ओरड मारू लागल्याचा आरोप त्यांनी केला.

Web Title: Sharad Pawar Let us first explain what you did for Maharashtra; Amit Shah's challenge