दुष्काळामुळे पवार दाम्पत्य गेले गुजरातला, नडियादमधील कापड कंपनीमध्ये होते नोकरीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 10:38 IST2025-06-14T10:32:47+5:302025-06-14T10:38:52+5:30
Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पवार दाम्पत्याचा मृत्यू झाला. गावातील पुतण्या सचिन पवार, सुमन पवार, उषा, कविता, मेहुणे सुनील इंगळे, बाळासाहेब सावंत असे सर्वजण मिळून गुरुवारी रात्री ७:३० वाजता हातीद येथून खासगी वाहनाने नडियादकडे गेले.

दुष्काळामुळे पवार दाम्पत्य गेले गुजरातला, नडियादमधील कापड कंपनीमध्ये होते नोकरीस
- अरुण लिगाडे
सांगोला - सांगोल्यात १९७२ साली प्रचंड पडलेल्या दुष्काळात गावी कामधंदा नसल्यामुळे महादेव पवार हे कुटुंबासह गुजरातला गेले होते. नडियाद या ठिकाणी मफतलाल कंपनीत त्यांना नोकरी मिळाली. पती-पत्नी दररोज नडियादमधील संताराम महाराज मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे आणि तेथूनच त्यांचा दिनक्रम सुरू व्हायचा. आई-वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याने मोठा धक्का बसल्याचे मुलगा रमेश पवार यांनी सांगितले.
अहमदाबाद विमान अपघातात पवार दाम्पत्याचा मृत्यू झाला. गावातील पुतण्या सचिन पवार, सुमन पवार, उषा, कविता, मेहुणे सुनील इंगळे, बाळासाहेब सावंत असे सर्वजण मिळून गुरुवारी रात्री ७:३० वाजता हातीद येथून खासगी वाहनाने नडियादकडे गेले. ते सर्वजण शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास नडियादमध्ये पोहोचले. महादेव पवार यांचा मुलगा रमेश व पुतण्या महेश हे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी अहमदाबाद सरकारी रुग्णालयात ठाण मांडून आहेत.
हातीदमध्ये स्वत:चे चार खोल्यांचे घर
मृत महादेव पवार यांचे कुटुंब आजही एकत्र असून, त्यांच्या नावे १६ एकर शेती आहे. हातीद येथेच पत्र्याच्या घरात हे कुटुंबिय राहतात. पण विमान दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना धक्का बसला आहे. त्यांच्या मुळ गावातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
एका महिन्यापूर्वीच गावाकडे येऊन गेले
नडियादमधील मफतलाल कापड कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर महादेव पवार अधूनमधून गावी हातीद येथे येत असायचे. २७ एप्रिल २०२५ रोजी उरुसानिमित्त ते पत्नीसह गावी आले होते. देवदर्शन झाल्यानंतर ते आठवडाभर घरीच राहिले होते. त्यानंतर ८ मे रोजी हे दाम्पत्य परत नडियादला निघून गेले. गावाकडचा त्यांचा हा शेवटचा प्रवास ठरला.