गोमूत्र प्यायल्याने नवजोत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा कॅन्सर झाला बरा? अनिरुद्धाचार्य यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 18:02 IST2026-02-01T18:01:30+5:302026-02-01T18:02:32+5:30
Navjot Kaur Sidhu : नवजोत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू यांनी मथुरेतील वृंदावन येथील 'गौरी गोपाल' आश्रमात जाऊन प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्धाचार्य यांची भेट घेतली.

गोमूत्र प्यायल्याने नवजोत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा कॅन्सर झाला बरा? अनिरुद्धाचार्य यांचा मोठा दावा
नवजोत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू यांनी मथुरेतील वृंदावन येथील 'गौरी गोपाल' आश्रमात जाऊन प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्धाचार्य यांची भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ नवजोत कौर यांनी त्यांच्या इन्स्टास्टाग्राम अकाउंटवरही शेअर केला आहे.
सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओमध्ये डॉ. नवजोत कौर यांनी कथावाचक अनिरुद्धाचार्य यांना सांगितलं की, त्या रोज गोमूत्राने स्नान करतात. यासोबतच त्या नियमितपणे गोमूत्राचं सेवनही करतात. कॅन्सरला हरवण्यासाठी गोमूत्र हे एक मोठं औषध ठरलं आहे. त्यांनी यापूर्वी प्रेमानंद महाराज यांचीही भेट घेतली होती.
अनिरुद्धाचार्य यांनीही शेअर केला व्हिडीओ
अनिरुद्धाचार्य यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये ते म्हणत आहेत की, "डॉ. नवजोत कौर अजूनही गोमूत्राने स्नान करतात आणि गोमूत्र सेवन करतात. नवजोत कौर यांनी आपला कॅन्सर आयुर्वेदिक औषधांच्या जोरावर बरा केला आहे. डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्या फक्त चार आठवडे जगतील, पण त्या गेल्या चार वर्षांपासून जिवंत आहेत."
या व्हिडिओमध्ये अनिरुद्धाचार्य पुढे म्हणाले की, "जर कोणाला कॅन्सर असेल, तर ते नवजोत कौर सिद्धू यांच्या यूट्यूब चॅनेलवर जाऊन सर्व डाएट प्लॅन पाहू शकतात. जर त्याचं पालन केलं, तर तुम्ही कॅन्सरला हरवू शकाल."
नवजोत कौर सिद्धू काय म्हणाल्या?
नवजोत कौर सिद्धू यांनी महत्त्वाची स्पष्टोक्ती दिली आहे. त्या म्हणाल्या की, "केवळ कॅन्सर तज्ज्ञांचे 'ॲलोपॅथिक' उपचारच तुमचा जीव वाचवू शकतात. जीवनशैलीत बदल, पेस्टिसाइड-फ्री ऑर्गेनिक जेवण, धान्य किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळणं आणि गोमूत्रासारख्या 'पर्यायी थेरपी' या केवळ सपोर्टिव्ह थेरपी म्हणून काम करतात. त्या तुमचा मूळ आजार कधीही पूर्णपणे बरा करू शकत नाहीत."
त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, "माझ्यासाठी डॉ. रुपिंदर बत्रा यांच्यासारख्या चांगल्या डॉक्टरांकडून तातडीने उपचार घेणं खूप गरजेचं होतं आणि कॅन्सरच्या रुग्णासाठी हाच एकमेव मार्ग आहे. सर्जरी, कीमोथेरपी आणि रेडिएशनमुळेच माझा जीव वाचला. मला लवकर बरं वाटण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत बदल करण्यात आले आणि याच बदलांमुळे हा आजार पुन्हा होण्यापासून रोखण्यात मदत झाली आहे."