मुंबई – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून ३० सप्टेंबरपर्यंत लोकल सेवा, एक्सप्रेस आणि मेल बंद राहणार असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. याबाबतचं रेल्वेच्या एका पत्राचा हवाला देण्यात येत आहे. यात पत्रात मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर आणि उपनगरीय रेल्वे सेवा कोरोना व्हायरसच्या संकटामुळे ३० सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे असा दावा करण्यात आला आहे.
तसेच या पत्रावर ११ मेच्या अधिसूचनेचा हवाला देण्यात आला आहे. त्यात तिकीट रद्द करण्यास मुदतवाढ दिली असली तरी विशेष मेल आणि एक्सप्रेस ट्रेन्स या वेळापत्रकानुसार सुरु राहतील. त्याचसोबत मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी चालवण्यात येत असलेल्या मर्यादित लोकलही सुरु राहतील असं म्हटलं आहे.
गणेशोत्सवादरम्यान कोकणात सोडण्यात येणाऱ्या गाड्या नियोजनानुसार धावतील. मध्य रेल्वेकडून दिवसाला ४ ट्रेन्स चालवल्या जातात. त्यातील २ ट्रेन्स छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तर उर्वरित ट्रेन्स लोकमान्य टिळक कुर्ला टर्मिनसवरुन सुटतात. पश्चिम रेल्वेतून आठवड्याला ५ ट्रेन्स सुटतात. मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथून विशेष एक्सप्रेस सोडल्या जातात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पत्राबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ११ मे रोजी रेल्वेकडून काढण्यात आलेल्या पत्रात विशेष ट्रेन्स वगळता उर्वरित रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित राहतील असं सांगितलं होतं.
त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत रेल्वे सेवा बंद राहतील याबाबत कोणतंही पत्र रेल्वे मंत्रालयाकडून काढण्यात आलं नाही. विशेष ट्रेन्स नियोजित वेळेनुसारच चालतील असं स्पष्टीकरण रेल्वेने दिलं आहे.
सोमवारी देशात कोरोना रुग्णांची संख्या २२ लाखांच्या वर पोहचली आहे, आज दिवसभरात ६२ हजाराहून जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एकूण रुग्णांपैकी १५ लाख ३५ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ४४ हजार लोकांचा मृत्यू आहे