सिंधुदुर्गला अवकाळी पावसाने झोडपले, आंबा, काजू पिकांना फटका
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: January 9, 2024 16:19 IST2024-01-09T16:19:08+5:302024-01-09T16:19:28+5:30
दिवसभर ढगाळ वातावरण : थंडी गायब

सिंधुदुर्गला अवकाळी पावसाने झोडपले, आंबा, काजू पिकांना फटका
सिंधुदुर्ग : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण ढगाळ बनले आहे. सोमवारी सायंकाळी दाखल झालेल्या अवकाळी पावसाने रात्री संपूर्ण जिल्हावासीयांना झोडपून काढले. जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात जत्रोत्सव सुरू असलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला.
अवकाळी पावसाने आंबा आणि काजू पिंकाना फटका बसणार असून बागायतदार धास्तावले आहेत.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मळभी वातावरणामुळे थंडी पळाली आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पावसाची रिपरिप सुरू झाली. तर मध्यरात्री मेघगर्जनेसह दमदार पाउस झाला. मंगळवारी सकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. सोमवारी पावसाने अनेक भागातील बत्ती गूल झाली होती.
आंबा, काजू पिकांना फटका
या बदलत्या वातावरणामुळे आंबा, काजू आणि इतर पिकांच्या फलोत्पादनावर परिणाम होणार आहे. चांगली थंडी पडली तर आंबा, काजूचे उत्पादन चांगले होते. मात्र, मोहोर येण्याच्या सुरूवातीपासूनच सातत्याने वातावरण बदलत असल्याने त्याचा फटका या दोन्ही पिकांना बसणार आहे