उद्धवसेना सत्ताधारी कुठल्याही पक्षाशी युती करणार नाही, पण..; वैभव नाईकांनी मांडली स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 16:29 IST2025-11-10T16:28:37+5:302025-11-10T16:29:58+5:30
Local Body Election: संदेश पारकर यांनी पुन्हा निवडणूक लढवावी हा जनतेचा आग्रह !

उद्धवसेना सत्ताधारी कुठल्याही पक्षाशी युती करणार नाही, पण..; वैभव नाईकांनी मांडली स्पष्ट भूमिका
कणकवली : महायुतीमधले दोन्ही सत्ताधारी पक्ष आहेत ते फक्त सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत, विचारासाठी नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना माहिती होतं की, आपण एकत्र आलो नाही तर सत्ता येणार नाही. तसेच आर्थिक प्रलोभने देऊन लोक फोडले नाहीत तर आपल्याला विजय मिळणार नाही. त्यामुळे त्या निवडणुकीमध्ये जरी त्यांनी विजय मिळविला असला, तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढण्याची त्यांची ताकद नाही. उद्धवसेना सत्ताधारी पक्षातील कुठल्याही पक्षाशी युती करणार नाही. परंतु काही स्थानिक लोकांनी एकत्र येऊन शहर विकास आघाडी केल्यास कणकवली नगरपंचायतीमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लढा दिला जाईल, अशी भूमिका माजी आमदार वैभव नाईक यांनी मांडली.
याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, शहर विकास आघाडीबाबत उद्धवसेनेचे उमेदवार किंवा कार्यकर्ते असतील त्यांच्या भावना जाणून घेऊन त्या वरिष्ठांच्या कानावर घातल्या जातील. त्यानंतर शहर विकास आघाडीमध्ये जायचे की स्वतंत्र महाविकास आघाडीमधूनच निवडणूक लढवायची, याचा विचार वरिष्ठ करतील.
नारायण राणे हे या विभागाचे खासदार असताना त्यांना न विचारता विशाल परब यांना भाजपत घेतले. तर शिंदे शिवसेनेमध्ये राजन तेली यांचा प्रवेश झाला. त्यामुळे राणेंच्या शब्दाला राज्याच्या राजकारणामध्ये किंमत राहिलेली नाही. त्यामुळे महायुतीबाबत खासदार राणेंनी विधान न केलेलंच बरं.
उद्धव ठाकरे हे पाच ते सहा दिवस शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेऊन त्यांचे अश्रू पुसण्यासाठी दौरा करीत आहेत. सरकारने जी मदत जाहीर केली, ती अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकरी टाहो फोडत आहेत. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांना कशी मदत मिळेल याकडे खासदार राणेंनी बघितलं पाहिजे.
सत्ताधारी जनतेला रोजगार देऊ शकले नाहीत
खरं तर शिंदेंचे आमदार हे भाजपच्या ताकदीवरच निवडून आलेले आहेत. सत्ताधारी पक्षांनी विकासाच्या बाबतीत ज्या घोषणा केल्या होत्या. त्या घोषणांमध्ये कुठलाही निधी आणला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सगळ्याच रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत . जनतेला ते रोजगार देऊ शकले नाहीत. मुंबई गोवा महामार्ग, चीपी विमानतळ, सगळे प्रश्न अपुऱ्या अवस्थेत आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, त्यावर कोणी बोलत नाही. त्यामुळे या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनता असल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.
संदेश पारकर यांनी पुन्हा निवडणूक लढवावी हा जनतेचा आग्रह !
संदेश पारकर कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे सर्वांचीच भूमिका आहे की, संदेश पारकर यांनी पुन्हा एकदा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभे राहावे. या शहरामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे, तो दूर व्हावा, ही लोकांची धारणा आहे. लोकांनी संदेश पारकर यांचे नाव सुचवले आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे.