Sindhudurg: विजयदुर्ग किल्ल्याचा बुरूज लाटांच्या माऱ्याने ढासळला, तटबंदी ढासळण्याची मालिका चालूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 12:41 IST2025-08-11T12:41:11+5:302025-08-11T12:41:58+5:30
युनेस्कोच्या ताब्यात गेल्यामुळे विजयदुर्ग किल्ल्याचा कायापालट होणार असा विजयदुर्गवासीयांना विश्वास

Sindhudurg: विजयदुर्ग किल्ल्याचा बुरूज लाटांच्या माऱ्याने ढासळला, तटबंदी ढासळण्याची मालिका चालूच
देवगड : विजयदुर्ग किल्ल्याच्या दिशादर्शक बत्तीजवळ असणाऱ्या व्यंकट बुरुजाची समुद्रातील लाटांच्या माराने खालची बाजू ढासळली. त्यामुळे किल्ल्याची तटबंदी ढासळण्याची मालिका चालूच असल्याचे दिसून येत आहे. पाऊस आणि लाटांचा मारा तीव्र असल्याने पावसाळ्यात विजयदुर्ग किल्ल्याची पडझड होत असते.
पावसाळ्यात समुद्राला उधाण येत असल्याने लाटांचा वेग यादरम्यान वाढत असतो. अशातच रात्रीच्या वेळेस किल्ल्यातील दिशादर्शक बत्तीजवळच्या व्यंकट बुरुजाची समुद्राकडील खालची बाजू ढासळली. किल्ल्याची बांधणी करताना, तसेच त्याची व्याप्ती वाढवताना त्यावेळेस सागर तटबंध आणि खडकांची नैसर्गिक रचना याचा विचारपूर्वक वापर करण्यात आला होता. विजयदुर्ग किल्ला हा खडकाळ द्वीपकल्पावर बांधलेला आहे. त्यामुळे तीन बाजूने खोल पाण्याचा व नैसर्गिक खडकांचे संरक्षण मिळतं.
तत्कालीन परिस्थितीत समुद्राच्या लाटा सरळ तटबंदीवर आढळून किल्ल्याचे नुकसान होऊ नये म्हणून तिरक्या उताराची खडकांची मांडणी केली होती. जेणेकरून लाटांची ऊर्जा कमी होऊन ती परत समुद्रात वळवली जाते. कालांतराने निसर्गातील बदलांमुळे ही रचना कमकुवत होत गेली. मात्र नंतर हा मारा थांबवण्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत.
‘ट्रायपॉड’ हा त्यावर उत्तम पर्याय होता. काँक्रीटच्या माध्यमातून हा ट्रायपॉड उभारणे आता गरजेचे झाले आहे. दरम्यान, आता युनेस्कोच्या ताब्यात हा किल्ला गेल्यामुळे विजयदुर्ग किल्ल्याचा कायापालट होणार आणि किल्ल्याची कोसळलेली तटबंदी पुन्हा भक्कमपणे उभी राहणार, असा विश्वास विजयदुर्गवासीयांमधून व्यक्त होत आहे.