Sindhudurg: वेंगुर्ल्यात पहिल्याच पावसात प्रशासकीय कारभाराचे पितळ उघडे, नागरिकांना मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 17:16 IST2025-05-27T17:13:34+5:302025-05-27T17:16:32+5:30
तब्बल चार दिवस वितरणची बत्ती गुल

Sindhudurg: वेंगुर्ल्यात पहिल्याच पावसात प्रशासकीय कारभाराचे पितळ उघडे, नागरिकांना मनस्ताप
सावळाराम भराडकर
वेंगुर्ला : कोकणात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसून जिल्ह्यातील बऱ्याच यंत्रणेच्या गलथान कारभाराचे पितळ उघडे पडले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्यामध्ये या पावसाचा कमी-जास्त प्रमाणात फटका बसला. मात्र, वेंगुर्ला तालुक्याला या पावसाने चांगलेच झोडपून काढले आणि जिल्ह्यात सर्वांत जास्त १६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाने वेंगुर्ला तालुक्याच्या कुचकामी यंत्रणेचे पितळ उघडे पडले.
तब्बल चार दिवस वितरणची बत्ती गुल झाली. तर नगरपंचायत प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली. महत्त्वाच्या मार्गावर गटार काढले नसल्याने पाणी थेट रस्त्यावरून वाहून मार्गावर बऱ्याच ठिकाणी माती आणि दगडाचा संचय झाला. एकूणच जनजीवन विस्कळीत होऊन संबधित सर्वच यंत्रणेच्या गलथान कारभाराचा मनस्ताप वेंगुर्ला तालुकावासीयांना झाला.
२० मे रोजी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या तडाख्यात वेंगुर्ला तालुक्याचा वीज पुरवठा खंडित झाला. गेले वर्षभर कोणतीच विजेची डागडुजी व देखभाल-दुरुस्ती केली नाही. दिवसभर पाट्या टाकून आपत्तीच्या वेळी सुट्टीवर जाणाऱ्या त्या अधिकारी वर्गाचा गलथान कारभाराचा फटका तालुकावासीयांना चांगलाच बसला. वीज दिवस-रात्र गुल झाल्याने बऱ्याच यंत्रणा बंद पडल्या. त्याचा फटका घरगुती कामाबरोबरच व्यावसायिक वर्गाला बसला. बाजारपेठेत ग्राहकांची मंदी जाणवली. आइस्क्रीम वितळून विक्रेत्यांना लाखो रुपयांचा फटका बसला. तर वातावरणातील गर्मी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे त्रासच झाला.
त्रासलेल्या वेंगुर्लावासियांनी आक्रमक पवित्रा घेत वितरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तर वीज आपत्तीची बैठक तहसीलदार कार्यालयात घेऊन विजेच्या प्रश्नी प्रश्नांचा भडिमार केला. तब्बल चार दिवस बंद पडलेल्या वीज वाहिन्या दुरुस्ती करण्यासाठी वितरणाच्या कर्मचारी वर्गाला कामाला लावले. मात्र, अजूनही विजेचा लपंडाव सुरूच आहे.
पावसाळ्यापूर्वी महावितरण विभागाकडून करण्यात येणारी कामे अद्यापही पूर्ण करण्यात आलेली नाहीत. जीर्ण झालेले विद्युत खांब, विद्युत तारांजवळ वाढलेली झाडे, उघड्या डीपी यांसारखी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी महावितरण विभागाने केलेल्या दिरंगाईमुळे विजेचा लपंडाव पावसाळ्यातही कायम राहिल्यास जनतेचा उद्रेक होणार एवढे नक्की.
पुलाचे काम संथ गतीने
काही मार्गावरील पुलाचे काम संथ गतीने सुरू असून, त्याचा फटका वाहतूक वर्गाला बसत आहे. तर मार्गालगत वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू असून बऱ्याच ठिकाणी मातीचे ढीग असल्याने त्याचा वाहतूक वर्गाला नाहक त्रास होत आहे. तुळस मार्गावर खचलेला रस्ता अजूनही ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे वेंगुर्ला तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे महत्त्वपूर्ण कामासाठी केलेले दुर्लक्ष पावसाळ्यात डोकेदुखी ठरणार आहे.
वेंगुर्ला नगरपरिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष
वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील महाजनवाडीनजीकच्या ओहोळावर उन्हाळ्यात पाणीटंचाई होऊ नये यासाठी लोखंडी प्लेट घालून पाणी अडविले होते. हा बांध दरवर्षी पावसाळ्यापूर्वी उघडला जातो. मात्र, यावर्षी संबंधित अधिकारी, कर्मचारी बांध उघडण्यास विसरले आणि वळिवाच्या मुसळधार पावसाच्या पाण्याबरोबर कचरा व झाडे अडकून बांधाकडे पाणी साचून लगतच्या पाटीलवाडा, धोकमेश्वर येथील परिसरात पाणी पसरून शेतीचे व बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पुराचे पाणी शेती बागायतीत
येथील नागरिकांनी वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांना पूरसदृश स्थितीची कल्पना दिली. तहसीलदार यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करत बांधावरील अडसर काढण्याचे निर्देश दिले. मात्र, पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे अथक प्रयत्नांनी बांधावरील अडसर दूर करून पाण्याचा प्रवाह कमी करत पाण्याचा निचरा केल्यावर पाण्याचा धोका टळला. मात्र, येथील शेती व बागायती मध्ये पुराचे पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, धोकमेश्वर -पाटिलवाडा येथील १५० फूट लांब असलेला संरक्षक कठडा व अतिवृष्टीमुळे व न.प. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोसळला.
वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीत गटारांची कामे अपूर्ण
वेंगुर्ला बाजारपेठ मार्गावरील गटाराचे काम ऐन मान्सून पूर्व पावसाळ्यात सुरू केल्याने त्याचा फटका येथील दुकानदार, वाहतूकवर्ग व ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बसला. खोल गटार खोदून त्यावर जाण्या-येण्यासाठी तात्पुरती केलेली तकलादू सोय अपघातास आमंत्रण देणारीच आहे. तर पॉवर हाऊस कॅम्प येथील संथ गतीने सुरू असलेले गटार आणि मोरीचे बांधकाम वेंगुर्लातील जड वाहतुकीस बाधा आणत आहे. एकूणच काय वेंगुर्ला तालुका प्रशासनाचा गलथान कारभार वळिवाच्या पावसाने उघड पाडला. मात्र, त्याचा नाहक फटका सर्वसामान्य नागरिकांना झाला.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
सार्वजनिक बांधकाम विभागानेही यावर्षी महत्त्वाच्या मार्गाची डागडुजी व देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. मार्गालगत गटार काढले नसल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहते. तर वाहत्या पाण्याबरोबर माती व दगड रस्त्यावर साचत आहेत. त्यामुळे हा मार्ग दुचाकीस्वारांसाठी तारेवरची कसरत बनला आहे. साइडपट्टीवरील झाडी अजूनही तोडण्यात आली नाही.