"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 18:23 IST2025-06-29T18:23:13+5:302025-06-29T18:23:35+5:30
मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणे यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले

"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
Bharat Gogavale VS Nitesh Rane: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी सिंधुदुर्ग मधल्या भाषणामध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांचे कौतुक करता करता एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नारायण राणे यांना एवढ्या उंचीवर जाण्याचे यश सहजासहजी मिळालेलं नाही, अंगावरती केसेस घेतल्या, भानगडी केल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केली असं वक्तव्य गोगावले यांनी केलं. गोगावले यांच्या या वक्ताव्यावर आता मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मर्डरबाबत नारायण राणेंविरोधात पोलीस रेकॉर्ड नाही, भेटल्यावरती भरत गोगावले यांच्या ज्ञानात भर टाकेन असं नितेश राणे म्हणालेत.
शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याची बैठक कुडाळ पावशी येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणेंबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं. सिंधुदुर्गामध्ये भाषणादरम्यान गोगावले यांनी नारायण राणेंनी मारामाऱ्या, मर्डर केल्याचा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकारण चांगलेच तापलं आहे. यावर मंत्री नितेश राणे यांनी गोगावलेंना प्रत्युत्तर दिलं.
"मी भरत गोगावले यांचे भाषण ऐकलेलं नाही. नारायण राणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. मर्डर केसबाबत असा कुठलाही पोलीस रेकॉर्ड त्यांच्या विरोधात नाही. कदाचित गोगावले यांना पूर्ण माहिती नसेल. आज संध्याकाळी चहापानाच्या निमित्ताने ते माझ्या खांद्याला खांदा लावून उभे असतील. नारायण राणे यांनी शिवसेना वाढवली. ते प्रत्येक शिवसैनिकाच्या बरोबर राहिले म्हणून बाळासाहेबांनी त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद दिले. भरत गोगावले हे त्यांचे जुने सहकारी आहेत. आज भेटल्यानंतर त्यांच्या ज्ञानात मी थोडीशी भर टाकेन," असं नितेश राणे यांनी म्हटलं.
काय म्हणाले भरत गोगावले?
"नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत. अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले, भानगडी केल्या, मारामारी केल्या, मर्डर सगळं झालं. वेगळं सांगायची आवश्यकता नाही," असं भरत गोगावले म्हणाले.
"सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वातावरण गेले अनेक वर्ष पाहतोय. निलेश राणेंच्या रुपाने सिंधुदुर्गात शिवसेनेला ताकद मिळाली. भानगडी केला नाही तो शिवसैनिक नव्हे. केसरकर भानगडी करणारे नाहीत त्यामुळे अडचण होते. मात्र निलेश राणे जशास तसं उत्तर देणारे आहेत. पण आता भानगडी करायचे दिवस संपले आहेत. निलेश राणे यांनी भानगडी करायची गरज नाही. सगळं जुळवून चालवायचं आहे," असंही भरत गोगावले यांनी म्हटलं.