मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाने घेतला वेग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:38 IST2020-11-12T13:36:48+5:302020-11-12T13:38:28+5:30
highway, kankvali, sindhudurgnews मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाने आता वेग घेतला आहे. या कामाअंतर्गत कणकवली शहरात उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. हा उड्डाणपूल जानेवारी महिन्यात वाहतुकीस खुला होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे .

कणकवली शहरात उड्डाणपुलाच्या कामाने आता वेग घेतला आहे.
कणकवली : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाने आता वेग घेतला आहे. या कामाअंतर्गत कणकवली शहरात उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. हा उड्डाणपूल जानेवारी महिन्यात वाहतुकीस खुला होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे .
गडनदी व जानवली नदी या दोन नद्यांच्या मध्ये कणकवली शहर वसलेले आहे. या शहरातून जाणाऱ्या मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. गडनदी वरील दोन्ही पूल पूर्ण होऊन त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे. तर जानवली नदीवरील एक पूल पूर्ण होऊन त्यावरून सध्या वाहतूक सुरू आहे. या नदीवरील दुसऱ्या पुलाचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे .
कणकवली शहरात दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून महामार्गाचे काम करण्यात येत आहे. त्यांनी शहरातुन जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाला प्राधान्य दिले आहे. हा उड्डाणपूल जानेवारीमध्ये खुला करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. कणकवली शहरात एस . एम . हायस्कूल ते नरडवे तिठा या दरम्यान १२०० मिटरचा उड्डाणपूल उभारला जात आहे . या पुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून दोन गाळ्यांमध्ये स्लॅबचे काम शिल्लक आहे . ते येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे .
शहरातील उड्डाणपुलाला सिमेंट पेव्हर बॉक्सची जोडणी करून जोड रस्ता तयार करण्यात आला आहे . हा जोड रस्ता जुलै महिन्यातील अतिवृष्टीमध्ये कोसळला होता . त्यावेळी मोठे जनआंदोलन झाले . यात एस . एम . हायस्कूल ते गांगोमंदिर बॉक्सवेल या दरम्यान भिंती ऐवजी उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाची मागणी नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी केली होती . मात्र या मागणीबाबत काय झाले ? त्याचे स्पष्टीकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने आंदोलनकर्त्यांना दिलेले नाही.
सर्व्हिस रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्षच !
कणकवली शहरातील उड्डाणपुलाचे काम अंतीम टप्प्यात आले असले तरी त्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या सर्व्हिस रस्त्यांकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे. या रस्त्यांच्या बाजूची गटारे तसेच नाल्यांची कामे अपूर्ण आहेत. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.