आंबा, काजू बागायतदारांचे चक्काजाम आंदोलन तूर्तास स्थगित; दोन दिवस थांबू, नाहीतर..; राजू शेट्टी यांचा इशारा
By सुधीर राणे | Updated: March 23, 2026 16:01 IST2026-03-23T15:59:01+5:302026-03-23T16:01:57+5:30
मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिले लेखी पत्र

आंबा, काजू बागायतदारांचे चक्काजाम आंदोलन तूर्तास स्थगित; दोन दिवस थांबू, नाहीतर..; राजू शेट्टी यांचा इशारा
कणकवली : कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या नुकसान भरपाईबाबत आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही. आंबा बागायतदारांसाठी हेक्टरी ५ लाख, काजूला हेक्टरी ३ लाख नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. यासाठी रास्ता रोको आंदोलन करताना आम्ही सविनय कायदे भंग आंदोलना अंतर्गत लाँग मार्च केले.
आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आंबा आणि काजू बागायतदारांना येत्या दोन दिवसात अधिवेशन संपण्यापूर्वी विधिमंडळात नुकसान भरपाई जाहीर केली जाईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे आजचे आंदोलन दोन दिवसांसाठी तूर्तास स्थगित करत आहोत अशी घोषणा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली. मात्र, दिलेले आश्वासन पूर्ण होण्याची वाट पहात फक्त दोन दिवस थांबू, नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडक देवू असा इशारा दिला.
मुंबई गोवा महामार्गावर आंबा बागायतदारांकडून आज, सोमवारी असलदे पेट्रोल पंप येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात असलदे ते नांदगाव, पाटीलवाडीपर्यंत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात लाँग मार्च काढण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंबा, काजू बागायतदारांना त्यांच्यामागण्यांबाबत लेखी आश्वासन दिले.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक, आंबा उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष काका ढोके, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, संजय गावडे, उत्तम लोके, एम.के.गावडे, व्ही.के. सावंत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, आंबा, काजू शेतक-यांच्या नुकसानी सदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनात कोणताच निर्णय न झाल्यास पुढील दोन दिवसांत ओरोस येथे सर्व शेतकऱ्यांची बैठक घेतली जाईल. त्या बैठकीत पुढील आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल. हे आंदोलन आम्ही मुंबई येथील वर्षा बंगल्यावरच करणार आहोत. त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गसह ठाणे, रायगड व पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-यांना सोबत घेतले जाईल , असा इशारा त्यांनी दिला. यानंतर नांदगाव, पाटीलवाडी येथे आंदोलन स्थगित करण्याची घोषणा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली. त्यानंतर पोलिस बंदोबस्त कमी करण्यात आला.
दोन दिवसांत निर्णय होईल !
१७ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती. त्यामध्ये त्यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी शेतक-यांना नुकसान भरपाईचा निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. त्याबाबत आता लेखी आश्वासन देण्यात आले आहे. बोगस खते, बी- बियाणे यासंदर्भात तपासणी पथके तयार करु. तोंडी तक्रारींच्या आधारावर कारवाई केली जाईल. गिर्ये येथील फळ संशोधन केंद्राची उभारणी केली जाईल. हमी भावासंदर्भातील निर्णय हा शासन स्तरावरचा विषय आहे, त्याबाबत पाठपुरावा करु. सावकारी कर्ज किंवा व्याज वसुली याबाबत सहकार व पणन विभागाला सोबत घेवून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दोन दिवसांत बागायतदारांच्या मदतीच्या संदर्भात निर्णय होईल. शेतकरी देखील आमचेच आहेत. जिल्हा प्रशासन सकारात्मक आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे तातडीने केले असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी सांगितले.