पेंडूर-खरारे येथे अवैध वाळू उत्खनन, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 15:52 IST2020-10-28T15:50:37+5:302020-10-28T15:52:08+5:30
sand, farmar, sindhudurgnews भरमसाठ वाळू उत्खननामुळे खाडीपात्र प्रमाणापेक्षा जास्त खोल होत आहे. त्यामुळे नदीकाठी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

भर दुपारच्यावेळी खरारेवाडी गणेशघाटासमोर कर्ली नदीपात्रात परप्रांतीय कामगार अवैध वाळू उत्खनन करीत असल्याचे निदर्शनास आले.
चौके : शासनाने वाळू लिलाव अजून जाहीर केलेले नसतानाही मालवण तालुक्यातील पेंडूर-खरारे परिसरात कर्ली खाडीत सध्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन केले जात आहे. या भरमसाठ वाळू उत्खननामुळे खाडीपात्र प्रमाणापेक्षा जास्त खोल होत आहे. त्यामुळे नदीकाठी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महसूल विभागाने बेकायदा वाळू उत्खननावर कारवाई करावी, अशी मागणी खरारे येथील शेतकरी नाना वाईरकर तसेच पेंडूर-खरारेतील शेतकऱ्यांनी केली आहे.
यावेळी नाना वाईरकर यांनी सांगितले की त्यांची सुमारे सव्वादोन एकर जमीन खरारेवाडीमध्ये कर्ली नदीकिनारी असून त्यामध्ये ३५० नारळाची, ५० आंब्याची व ५० सुपारीची आणि काही फणसाची झाडे आहेत. अती उत्खननामुळे दरवर्षी शेतकऱ्यांची अनेक नारळाची झाडे आणि ८ ते १० फूट जमीन नदीपात्र गिळंकृत करीत आहे.
मोठ्या प्रमाणातील वाळू उत्खननामुळे भूस्खलन होऊन दरवर्षी नदीपात्राला लागून असलेल्या ५०० मीटर लांबीच्या भूभागाचा थोडाथोडा भाग आणि झाडे नदीपात्रात गायब होतात. त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान होत आहे. सध्या दुपारी दोन वाजल्यापासून सात ते आठ होड्या घेऊन परप्रांतीय कामगार खरारेवाडी गणेश घाटासमोरच नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करीत आहेत. मात्र, त्यांच्यावर कोणाचाच अंकुश नाही.
बड्या वाळू व्यावसायिकांशी असलेले हितसंबंध सांभाळण्यासाठी महसूल अधिकारी मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष करीत आहेत आणि दिवसाढवळ्या होत असलेल्या वाळूच्या लुटमारीवर कारवाई करण्याचे टाळत आहेत, असा आरोपही नाना वाईरकर यांनी केला आहे. या उत्खननावर ताबडतोब कारवाई करून शेतकऱ्यांना
दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
वैभव नाईक यांच्यासमोर मांडली कैफियत
नाना वाईरकर यांनी सोेमवारी दुपारी २ वाजता प्रत्यक्ष नदीच्या किनारी उपस्थित राहून दिवसाढवळ्या होत असलेली वाळू चोरी दाखवली. तसेच यावेळी भातशेती नुकसानीची पाहणी करण्यासाठी खरारे येथे आलेल्या आमदार वैभव नाईक यांच्या समोरही आपली कैफियत मांडून अवैध वाळू उत्खननाला आळा घालावा, अशी मागणी केली.
यावेळी महसूल विभागाचे अधिकारी आणि तलाठीसुद्धा उपस्थित होते.