सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील वीस वर्षांतील उच्चांकी पाऊस मे महिन्यात बरसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:50 IST2025-06-07T15:49:39+5:302025-06-07T15:50:10+5:30

शेतकऱ्यांकडून भात पेरणी सुरू, अवकाळीमुळे मोठे नुकसान

highest rainfall in the last twenty years in May in Sindhudurg district | सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील वीस वर्षांतील उच्चांकी पाऊस मे महिन्यात बरसला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील वीस वर्षांतील उच्चांकी पाऊस मे महिन्यात बरसला

गिरीश परब

सिंधुदुर्गनगरी : पावसाळी हंगाम सुरू होण्याच्या अगोदरच अवकाळी पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजवला. मे महिन्यात तब्बल ५४१ मिमीच्या सरासरी जिल्ह्यात पाऊस झाला. पावसासोबतच जोरदार वादळवारे झाल्याने शंभरपेक्षा जास्त घरे, गोठ्यांची पडझड होऊन ३७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दोघांचा यादरम्यान मृत्यू झाला आहे.

गत २० वर्षांत असा अवकाळी पाऊस झाला नसल्याची नोंद प्रशासन दप्तरी आहे. दरम्यान जून महिन्यात अधूनमधून एखाद दुसरी पावसाची सर सोडली तर ठिकठिकाणी कडकडीत ऊन पडल्याचे पाहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे.

दरवर्षी मे महिन्यात एक ते दोन दिवस किंवा महिन्याअखेर अवकाळी पाऊस पडतो. परंतु या वर्षी मात्र १२ मेपासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झाली. १९ मेपर्यंत पावसाला तितकासा जोर नव्हता. २० ते २९ मी या कालावधीत पावसाने राखले व मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाला. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना शेतीची मशागतपूर्व कामेसुद्धा करता आली नाही.

३० मेनंतर ते आतापर्यंत पावसाने बऱ्यापैकी उसंत घेतली आहे. एखाद दुसरी पावसाची सर सोडली तर दिवसभर कडकडीत ऊन पडलेले पाहावयास मिळत आहे. शेतकऱ्याने अवकाळी पडलेल्या पावसाच्या जोरावर भारतीय केले आहेत. अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे पेरलेल्या भाताला अंकुर आले आहेत.

पावसाच्या आगमनाचा खरा हर्ष उल्हास हा मुघल नक्षत्रपासून सर्वत्र साजरा केला जातो. साधारण ७ जून मृग नक्षत्राला सुरुवात होते. याला मिरग देखील म्हटले जाते. परंतु मान्सूनचा अद्याप पत्ता नाहीये. मृग कोरडा जातोय की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे.

१९ दिवसांत ३५ लाखांचे नुकसान; २ मृत्यू, १०० घरांची पडझड

मे महिन्यात गेल्या दहा वर्षांत कधी नव्हे एवढा पाऊस या १९ दिवसांत झाला आहे. १०२ गावे यामुळे बाधित झाली आहेत. कणकवली व कुडाळ येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. १०० घरे व १० गोठ्यांची पडझड होऊन ३५ लाखांचे नुकसान आहे. २ जनावरे दगावून त्यांचे १ लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

गेल्या २० वर्षांत झालेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)
२००५ - ३५.५
२००६ - ३४४.१
२००७ - ५२.१
२००८ - २२.२
२००९ - १५.८
२०१० - १३.८
२०११ - ०
२०१२ - ०
२०१३ - ०
२०१४ - ३.८
२०१५ - २३
२०१६ - ४
२०१७ - ७२.६
२०१८ - ३०.७
२०१९ - ०
२०२० - ७
२०२१ - ३११
२०२२ - ३१.३
२०२३ - ३.१
२०२४ - ५१.८
२०२५- ५४१

७४ गावातील शेतकऱ्यांचे ४० हेक्टरचे नुकसान

काजू, आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे खूप मोठे नुकसान झाले. ७४ गावातील १७५ शेतकऱ्यांचे ४० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाल्याचे पंचनामाच्या माध्यमातून समोर आले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय पंचनामाच्या सूचना केल्यानंतर तालुका कृषी कर्मचाऱ्यांकडून ही कार्यवाही करण्यात आली होती.

मे महिन्यात झालेला पाऊस

देवगड ५७९.५ मिमी, मालवण ४५२.९ मिमी, सावंतवाडी ६६४.६ मिमी, वेंगुर्ला ६६८.४ मिमी, कणकवली ५८६.५ मिमी, कुडाळ ५६२.१ मिमी, वैभववाडी ५२९ मिमी, दोडामार्ग ४९४ मिमी

पाण्याच्या पातळीत मोठी वाढ

यंदा मे महिन्यात पाणीटंचाईची तीव्रता जाणवली नाही. त्याला कारण म्हणजे अवकाळी झालेला पाऊस. सध्या धरणातील, ओढा, तलाव व नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील दोन धरणांमधील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

Web Title: highest rainfall in the last twenty years in May in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.