सिंधुदुर्गातील आंबा उत्पादकांना विशेष आर्थिक पॅकेजद्वारे मदत करा, खासदार नारायण राणे यांची केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 16:23 IST2026-03-10T16:23:02+5:302026-03-10T16:23:40+5:30
जिल्ह्यात या वर्षी सामान्य उत्पादनाच्या तुलनेत आंब्याचे उत्पादन सुमारे ८५ ते ९० टक्के कमी होऊ शकते

सिंधुदुर्गातील आंबा उत्पादकांना विशेष आर्थिक पॅकेजद्वारे मदत करा, खासदार नारायण राणे यांची केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मागणी
कणकवली : सततच्या हवामानातील बदलामुळे आंबा पिकाचे नुकसान होत आहे. अवकाळी पाऊस, दीर्घकाळपर्यंत थंडी आणि फुलधारणेच्या काळात वाढलेली आर्द्रता आंबा पिकासाठी धोकादायक ठरत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई देण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
खासदार राणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक बागांमध्ये आंब्याला आलेला मोहोर सुकला, जळून गेला आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फळगळ दिसून आली आहे. कृषी विभाग आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी आंबा बागायतींची तपासणी केली. या तपासणी अहवालातील निष्कर्षांनुसार परिस्थिती चिंताजनक आहे.
जिल्ह्यात या वर्षी सामान्य उत्पादनाच्या तुलनेत आंब्याचे उत्पादन सुमारे ८५ ते ९० टक्के कमी होऊ शकते. सिंधुदुर्ग जिल्हा जगप्रसिद्ध हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. हजारो शेतकरी त्यांच्या उपजीविकेसाठी पूर्णपणे या पिकावर अवलंबून आहेत. सध्याच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
ही बाब लक्षात घेता पिकांच्या नुकसानीचे केंद्रीय पथकाकडून मूल्यांकन करण्यात यावे. बाधित आंबा शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत पॅकेज द्यावे. केंद्रीय कृषी योजनांअंतर्गत मदत वाढविण्यात यावी. तसेच कोकणातील बागायती पिकांवर हवामान बदलाचा होणारा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा विचार करावा. बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्यात यावी अशी मागणीही केली आहे.