Sindhudurg: वर्षा पर्यटनावरून परतताना काळाचा घाला, एसटी-रिक्षाच्या धडकेत चार रिक्षा व्यावसायिक ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 14:09 IST2025-06-21T14:06:15+5:302025-06-21T14:09:51+5:30

एक जण गंभीर जखमी, आचरा गावावर शोककळा

Four rickshaw drivers killed in accident involving ST rickshaw on Naringre Kotkamte road in Sindhudurg district | Sindhudurg: वर्षा पर्यटनावरून परतताना काळाचा घाला, एसटी-रिक्षाच्या धडकेत चार रिक्षा व्यावसायिक ठार

Sindhudurg: वर्षा पर्यटनावरून परतताना काळाचा घाला, एसटी-रिक्षाच्या धडकेत चार रिक्षा व्यावसायिक ठार

देवगड : तालुक्यातील नारिंग्रे कोटकामते मार्गावर नारिंग्रे स्मशानभूमीनजीक एसटीला रिक्षाची धडक बसून झालेल्या भीषण अपघातात रिक्षामधील आचरा (ता.मालवण) येथील चार रिक्षा व्यावसायिक ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

मृतांमध्ये रिक्षा चालक संकेत सदानंद घाडी (३५, रा.आचरा वरचीवाडी), संतोष रामजी गावकर (३५, आचरा गाऊडवाडी), रोहन मोहन नाईक (३५, आचरा गाऊडवाडी) आणि सुनील उर्फ सोनू कोळंबकर (४२, आचरा पिरावाडी) यांचा समावेश आहे. गंभीर जखमी रघुनाथ रामदास बिनसाळे (४५, रा.आचरा भंडारवाडी) याला गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.

हा अपघात शुक्रवारी दुपारी ३:४५ वाजण्याच्या सुमारास घडला. हे सर्व जण वर्षा पर्यटनासाठी देवगड तालुक्यात आले होते. पर्यटन आटोपून हे पाच जण आचरा येथे आले आणि पुन्हा देवगडकडे जात असताना यातील चौघांवर काळाने घाला घातला.

आचरा येथील रिक्षा चालक संकेत घाडी याच्यासमवेत तेथील संतोष गावकर, रोहन नाईक, सोनू कोळंबकर, रघुनाथ बिनसाळे हे आपल्या इतर मित्रांसमवेत रिक्षाने देवगड तालुक्यात वर्षा पर्यटनासाठी आले होते. देवगड आगारातून दुपारी अडीच वाजता सुटलेली विजयदुर्ग मालवण ही एसटी नारिंग्रे-कोटकामते मार्गावरून मालवणच्या दिशेने जात होती. या एसटीवर चालक संदीप अनंत माळगावकर तर वाहक म्हणून डी.एम. भेले हे सेवा बजावत होते. 

दुपारी ३:४५ वाजण्याच्या सुमारास संकेत घाडी यांची रिक्षा नारिंग्रे स्मशानभूमीनजीक चढ-उताराच्या वळणावर अचानक समोर आलेल्या विजयदुर्ग-मालवण या एसटीला बाजू देताना संकेत घाडी यांचा रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा पलटी होऊन एसटीला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, रिक्षातील चालक संकेत घाडी, संतोष गावकर, सोनू कोळंबकर हे जागीच ठार झाले, तर रोहन नाईक व रघुनाथ बिनसाळे हे गंभीर जखमी झाले होते.

या अपघाताचे वृत्त परिसरात पसरताच, स्थानिक ग्रामस्थांसह मिठबांव सरपंच भाई नरे, शैलेश लोके, काका नरे यांच्यासह मिठबांव ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबविले. यातील गंभीर जखमी रोहन नाईक आणि रघुनाथ बिनसाळे यांना रामेश्वर प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेने तत्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, यातील गंभीर जखमी असलेला रोहन नाईक याचा वाटेतच मृत्यू झाला, तर रघुनाथ बिनसाळे याच्यावर देवगड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून, अधिक उपचारासाठी त्याला गोवा बांबुळी येथे नेण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच, देवगड पोलिस निरीक्षक भरत धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक सुप्रिया बंगडे, पोलिस हवालदार आशिष कदम, प्रवीण सावंत, नीलेश पाटील, स्वप्निल ठोंबरे, योगेश महाले, नितीन डोईफोडे, गणपती गावडे आदींनी घटनास्थळी जात पंचनामा केला. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी मिठबांव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. यावेळी तेथे आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, शिंदेसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे यांच्यासह सुमारे २०० हून अधिक आचरा ग्रामस्थ, रिक्षा व्यावसायिक, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

अपघातात मृत झालेल्यांचे नातेवाईक मिठबांव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले आणि यावेळी त्यांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. मृत रोहन गावकर यांचा तीन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. सोनू कोळंबकर याला दोन मुली असून, संकेत घाडी यांनी पंधरा दिवसांपूर्वीच आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता.

...आणि काळाचा घाला

आचरा येथील सुमारे १५ रिक्षा व्यावसायिक समूहाने देवगड तालुक्यात वर्षा पर्यटनासाठी आले होते. मसवी येथे त्यांनी एकत्रित स्नेहभोजन करून आचरा येथे सर्वांनी परतीचा प्रवास सुरू केला. मात्र, संकेत घाडी आणि त्याच्यासोबत संतोष गावकर, रोहन नाईक, सोनू कोळंबकर, रघुनाथ बिनसाळे हे आचरा येथे पोहोचताच, पुन्हा देवगडच्या दिशेने माघारी आले आणि त्यांच्यावर काळाने घाला घातला.

Web Title: Four rickshaw drivers killed in accident involving ST rickshaw on Naringre Kotkamte road in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.