महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीची पर्यटनदृष्ट्या जाहिरात करण्याचा प्रस्ताव!, तारकर्लीत सात राज्यांच्या उच्चस्तरीय नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 16:19 IST2022-11-11T16:18:50+5:302022-11-11T16:19:15+5:30

निसर्गरम्य सागरी किनारपट्टीचा पर्यटन विकासाच्या दृष्टीने वापर करून राज्याच्या आणि देशाच्या उत्पन्नात वाढ करण्याचा प्रस्ताव तारकर्ली येथे झालेल्या महाराष्ट्रासह सात राज्यांच्या उच्चस्तरीय नियोजन व अर्थ विभागातील अधिकार्‍यांच्या दोन दिवसीय चर्चासत्रात मांडण्यात आला

A proposal for tourism promotion of the sea coast of Maharashtra | महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीची पर्यटनदृष्ट्या जाहिरात करण्याचा प्रस्ताव!, तारकर्लीत सात राज्यांच्या उच्चस्तरीय नियोजन

महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीची पर्यटनदृष्ट्या जाहिरात करण्याचा प्रस्ताव!, तारकर्लीत सात राज्यांच्या उच्चस्तरीय नियोजन

ओरोस : महाराष्ट्र राज्याला लाभलेल्या निसर्गरम्य सागरी किनारपट्टीचा पर्यटन विकासाच्या दृष्टीने वापर करून राज्याच्या आणि देशाच्या उत्पन्नात वाढ करण्याचा प्रस्ताव तारकर्ली येथे झालेल्या महाराष्ट्रासह सात राज्यांच्या उच्चस्तरीय नियोजन व अर्थ विभागातील अधिकार्‍यांच्या दोन दिवसीय चर्चासत्रात मांडण्यात आला आहे. हे अधिवेशन महाराष्ट्र राज्याच्या अर्थ व सांख्यिकी विभागाने आयोजित केले होते. महाराष्ट्रासह राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मिर व लद्दाख या सात राज्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्याच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे राज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज (GSDP & DDP) परिगणनासंदर्भात केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, भारत सरकार यांच्या सूचनांनुसार व राज्याच्या नियोजन विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मिर व लद्दाख या सात राज्यांचे दोन दिवसीय चर्चा सत्र बुधवार व गुरुवारी एमटीडीसी तारकर्ली येथे झाले. या कार्यशाळेस महाराष्ट्रासह सहा राज्यांचे अधिकारी उपस्थित होते हिमाचल प्रदेशचे अधिकारी आनलाईन उपस्थित होते.

चर्चासत्र विजय आहेर, संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली  झाले. या चर्चासत्रात डॉ. ओमप्रकाश भैरवा (भा.प्र.से.), अर्थ व सांख्यिकी संचालनालय, राजस्थान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हरियाणा व लडाख राज्यांचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक अनुक्रमे डॉ. राजवीर भारद्वाज व अब्दुल खलिक भट्टी हे उपस्थित होते. या शिवाय डॉ. ज्ञानदेव तलुले, प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि डॉ.काकली मुखोपाध्याय, प्रोफेसर, गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्राच्या माध्यामातून विषयावरील सखोल अभ्यासपुर्ण चर्चा व सांख्यिकीय माहितीच्या आदानप्रदान करण्यात आले.

पर्यटनाबाबत गतिमान धोरण राबविण्यावर चर्चा

तारकर्ली येथील सृष्टीसौंदर्याबाबत या नॉन कोस्टल राज्यांच्या प्रतिनिधींनी याबाबतचे प्रमोशन करण्याबाबत सुचविले. महाराष्ट्र राज्याला सुमारे ७२० कि.मी.अंतराचा समुद्र किनारा लाभलेला आहे. सागरी किनाऱ्यावर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीसिंधुदुर्ग हे जिल्हे वसलेले आहेत. इतर नॉन कोस्टल राज्यातील पर्यटकांना सागरी समुद्र पर्यटनाचे मोठे आकर्षण असते. त्याअनुषंगाने महाराष्ट्रातील सागरी पर्यटनाची मोठ्या प्रमाणात व विविध माध्यमातून माहिती व जाहिरात झाल्यास त्याद्वारे इतर नॉन कोस्टल राज्यातील पर्यटक आकर्षित होवून सागरी पर्यटनाकडे त्यांचा ओघ वाढेल. सागरी पर्यटनाबाबत आपणास अधिक व्यावसायिक दृष्टीकोनातून विचार करुन त्याअनुषंगाने राज्याची गतीमान धोरण तयार केले पाहिजे.

राज्याच्या उत्पनात सागरी पर्यटनाचा हिस्सा

समुद्राद्वारे होणारी आर्थिक प्राप्ती बरोबरच महाराष्ट्रातील सागरी किनारे व सृष्टीसौंदर्य यामुळे पर्यटन क्षेत्रास चालना मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटकांना सागरी पर्यटन आकर्षित करत असते. पर्यटनाद्वारे मिळण्याच्या राज्य उत्पन्नाचा निश्चीत मोठ्या प्रमाणात हिस्सा आहे. राज्य उत्पन्नात सागरी पर्यटनाचा हिस्सा अधिकाधिक वाढविण्यात मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाल्यास निश्चीतच राज्याचे ट्रिलीयन डॉलरच्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचण्याचे ध्येय गाठण्यास मदत होवू शकते अशा प्रकारची देखील चर्चा झाली.

Web Title: A proposal for tourism promotion of the sea coast of Maharashtra